
बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
पडघा पोलिसांनी नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात २२ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कारासह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणमध्ये पक्षाच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षातील एखाद्या नेत्यावर छोटासा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आक्रमक होतात आणि त्यानंतर मीडिया ट्रायल सुरू होते. मात्र, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती भाजपशी संबंधित असल्यामुळे त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. नरेंद्र पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांना कोणतेही राजकीय संरक्षण न देता तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पीडित महिलेचा तिच्या पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करून मदत करण्याच्या बहाण्याने तिला बोलावण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरातील एका फार्महाऊसवर नेण्यात आले. तेथे शस्त्राचा धाक दाखवून मद्य पाजण्यात आले आणि लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. या आरोपांच्या आधारे पडघा पोलिसांनी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, नरेंद्र पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. आपल्याविरोधातील आरोप खोटे असून बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. या प्रकरणामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये म्हणून आपण पदे सोडत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
या प्रकरणात पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. केडीएमसीतील काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली असून, अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. केडीएमसीमध्ये अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नसल्याचे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्त्यांबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दोन्ही पक्षांमधील वाद सुरूच राहणार असेल, तर नागरिकांची कामे कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी वरुण सरदेसाई कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आले होते. कल्याण पश्चिमेतील मंगेशी हॉलमध्ये आयोजित बैठकीला सरदेसाई यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे केडीएमसी गटनेते उमेश बोरगावकर, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी नरेंद्र पवार प्रकरणासह केडीएमसीतील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. नरेंद्र पवार प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यांच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.
Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”