
TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा...; काँग्रेसचा इशारा
मुंबई : नीट पेपरफुटी प्रमाणेच राज्यात सीईटी व टीईटीचे पेपर फुटले आहेत, याचा ६ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. भाजपा सरकारच्या नालायकपणामुळे लाखो विद्यार्थी व पालकांना मनस्ताप झाला असून त्यांच्या स्वप्नांवर वरंवटा फिरवला आहे पण शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. येत्या ७ दिवसात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अन्यथा समविचारी पक्ष व संघटना यांच्यासह काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोल करतील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश NSUI चे अध्यक्ष सागर साळुंखे आणि मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करत गैरकारभार चव्हाट्यावर मांडण्यात आला. यावेळी NSUI, युवक काँग्रेसच्या वतीने जेन झी युनिव्हर्सिटी मार्फत शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रतीकात्मक गुणपत्रिका जाहीर करण्यात आली. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अपयशामुळे या गुणपत्रिकेत दादा भुसे यांना नापास घोषित करण्यात आले.
यावेळी बोलताना सागर साळुंखे पुढे म्हणाले की, राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. भाजपा महायुती सरकारने शिक्षण हे सेवेसाठी नाही तर पैसे कमावण्याचे साधन बनवले आहे. शिक्षकांना बीएलओ चे काम दिल्याने शाळा ओस पडल्या आहेत, मुलांचे नुकसान होत आहे. तर अतिरिक्त कामाच्या ताणामुळे शिक्षकांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे, मुंबईत एका शिक्षकाचा अशाच कामाच्या ताणामुळे मृत्यू झाला आहे. शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग या तिन्ही विभागात अनागोंदी कारभार सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक करुन हजारो रुपये उकळले जात आहेत. बोगस नर्सिंग स्कूलचा सुळसुळाट झाला आहे.
पुण्यातील सीईओपी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून ८१ हजार रुपये डेव्हलपमेंट फी, २२ हजार रुपये लॅबोरेटरी फी घेतली तसेच १७ हजार रुपये शिक्षण फी आकारली जाते, अशा पद्धतीने चंद्रकांत पाटील यांनी लूट चावलली आहे. शिक्षण विभाग पैसे कमावण्याचा धंदा बनवला आहे, कॉलेज प्रवेश प्रक्रियेसाठी पाच कोटी रुपयांचे टेंडर दिले आहे पण अद्याप अकारावीच्या ४ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. शिक्षण विभागातील हे गैरप्रकार थांबवले नाहीत तर रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू असेही सागर साळुंखे यांनी म्हटले आहे.
यावेळी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन म्हणाल्या की, टीईटी पेपरफुटीनंतर युवक काँग्रेसने विविध आंदोलने करुन सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला पण सरकार अजून जागे झालेले नाही. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल. भाजपा सरकारने नीट व सीईटी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केला असताना, मंत्री मंगलप्रभात लोढा हे थँक्यू मोदी, हे अभियान चालवत आहेत हे आश्चर्य आहे. आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला केला, पॅलेट गनने चालवल्या बिहारमध्ये तर एके ४७ रायफलने गोळीबार केला. हजारो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले म्हणून थँक्यू मोदी अभियान करत आहात का? असा संतप्त प्रश्न विचारून भाजपाला जनाची नाही मनाची तर आहे का, असेही झीनत शबरीन य़ांनी म्हटले आहे.