फोटो सौजन्य- सोशल मीडिया
जळगावमध्ये मेहरूण तलावात महाराष्ट्रातील पहिला तीन दिवसीय ‘ॲक्वाफेस्ट’ जल पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी 15 कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी, अशी घोषणाही मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
या महोत्सवाच्य उद्घाटनप्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते.
जल पर्यटन प्रकल्प कायम स्वरूपासाठी राबविणार
जळगाव जिल्ह्यात व जिल्ह्याला लागून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटनस्थळे आहेत. जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित केली जात असून आज पाण्यातला हा बोटींचा साहसी खेळ अनुभवल्यानंतर मेहरूण तलावात हे जल पर्यटन प्रकल्प कायम स्वरूपासाठी राबविणार असून यासाठी 15 कोटी रुपये देण्याचे निश्चित केले असून प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून इथे जल पर्यटन सुरु केले जाईल, अशी घोषणा मंत्री श्री. महाजन यांनी केली. तसेच 20 कोटी रुपयाचा निधी मेहरूण तलावाच्या चौपाटीसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. फक्त जळगावकरांसाठीच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील पर्यटकांसाठीही हे आकर्षण केंद्र ठरेल, असा विश्वासही मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.
यावेळी पर्यटनमंत्री मंत्री गिरीश महाजन स्पीड बोट चालवून घेतला थरारक अनुभव घेतला.
राज्यामध्ये पर्यटन धोरणानुसार अनेक कामे सुरु
आपल्या राज्याला 750 किलोमीटर एवढी मोठी समुद्र किनारपट्टी आहे. इथल्या पर्यटनात मोठी क्षमता असून जगभराचे पर्यटक याठिकाणी आकर्षित होतील यासाठी सिंधुदुर्गच्या जवळ स्कुबा डायव्हिंगचा प्रकल्प सुरु केला आहे. समुद्राच्या आतमध्ये जाऊन तिथलं जैविक वैभव ज्यात सर्व प्रकारचे जलचर प्राणी, मासे, वनस्पती पाहायला मिळतील. आजपर्यंत इथे परदेशी पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल नव्हते ते आता हॉटेल ताजच्या रूपात पहिल्या हॉटेलच्या पायाभरणीचा शुभारंभ होणार असल्याचेही पर्यटन मंत्री यांनी सांगितले. तसेच राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नसेल अशी डेक्कन ओडिसी सुरु करणार असून यात 24 तास राहण्यासाठीच्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.