ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात सुरु होतं. या नुतनीकरणाबाबत अनेक कलाकरांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ग़डकरी रंगायतन हे फक्त कलाकारांसाठीच नव्हे तर ठाणेकर रसिकांसाठी देखील महत्वाचं आहे. अशातच आता या रंगायतनाचं अंतिम टप्प्यात असलेलं काम देखील आता पुर्णत्वास गेलं आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राम गणेश गडकरी रंगायतन ठाणेकरांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असून ठाणे शहराला गडकरी रंगायतन शिवाय ठाण्याला शोभा नाही, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम गणेश गडकरी रंगायतनाच्या लोकार्पण प्रसंगी मांडले.स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधत शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नूतनिकृत वास्तूचे लोकपर्ण करण्यात आले. गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजून पडदा बाजूला जातोय याचा विशेष आनंद वाटत असल्याची भावना यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
राम गणेश गडकरी रंगायतनच्या उभारणी मध्ये ठाणेकरांचे मोठे योगदान आहे. गडकरी रंगायतन हे कलावंतांचे अविभाज्य भाग आहे. ही एक बिल्डिंग नसून ती एक जिवंत वास्तू असून ठाण्याचे हृदय असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी राजकीय इच्छा शक्ती देखील असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.गडकरी रंगायतन सुरु होण्याची ठाणेकर रसिक जवळपास वर्षभर वाट पाहत होते, व्यासपीठ सुन्न होते, पडदा बंद होता, अखेर आज या वास्तूची तिसरी घंटा वाजली. नाट्य गृहाची दुरुस्ती करत असताना नाट्य कलावंतांच्या आणि कलाप्रेमीच्या सूचना महत्वाच्या होत्या. त्यामुळेच दुरुस्तीला काहीसा वेळ लागला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
या नाट्यगृहत अनेक नाटके झाली, तालीम झाल्या अनेक कलावंत घडले आणि याच ठिकाणी राजकीय सभा देखील झाल्याचे सांगत शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडकरी रंगायतनमध्ये अजूनही काही उणिवा असतील तर सांगा, गडकरी रंगायतनसाठी निधीची कमरतरता कधी पडू देणार नाही असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.