
राज्यातील ५० लाख मतदार कमी होणार : किरीट सोमय्या
सांगली : राज्यातील मतदार यादी शुद्धीकरण (एसआयआर) प्रक्रियेनंतर सुमारे 50 लाख मतदारांची नावे कमी होणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. जिल्ह्यातील ऊरुण ईश्वरपूर नगरपालिका व आटपाडी नगरपंचायतीला भेट दिल्यानंतर सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ईश्वरपूर व आटपाडी येथील मतदारयादीत त्रुटी आढळून आल्याचे सांगत सोमय्या म्हणाले, या प्रकरणी सात दिवसांत चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत घोळ असून, बोगस नावांचा समावेश झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देशात शेवटचे व्यापक मतदार यादी शुद्धीकरण २००२ मध्ये झाले होते. त्यानंतर २०२६ मध्ये एसआयआर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणताही बांग्लादेशी नागरिक मतदार यादीत राहता कामा नये, अशी भूमिका भाजपची असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. मात्र, भारतीय नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
मतदार यादीतील बोगस नावे शोधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने तीन लाख जन्म दाखले रद्द केल्याची यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
1 एप्रिलपासून मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू होणार
१ एप्रिलपासून मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू होणार असून, मतदान अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. २००२ व २०२६ मधील मतदार यादींची तुलना करून प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी भाजपकडून बुथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
राज्यातील 12 ठिकाणी एसआयआर संदर्भात कार्यशाळा
१५ मार्चपर्यंत राज्यातील 12 ठिकाणी एसआयआर संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, स्वरूपराव पाटील, विलास काळेबाग, केदार खाडीलकर, नगरसेविका स्वाती शिंदे, स्वाती खाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेदेखील वाचा : Kirit Somaiya : “मुस्लिम मुलं हिंदू मुलींना फसवतात…”, लव्ह जिहादसंदर्भात किरीट सोमय्या यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र