जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार
जलसंधारणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजवाडा ते शिवतीर्थ भव्य वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनला अध्यक्षा डॉ. शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. या प्रसंगी नगराध्यक्ष अमोल मोहिते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसरंक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अध्यक्षा डॉ. शिंदे म्हणाल्या, शालेय स्तरावरूनच जलसाक्षरता निर्माण करण्यावर भर दिला जावा. बालवयातच पाण्याचे महत्त्व मनावर बिंबवले तरच एक संवेदनशील आणि जबाबदार पिढी घडेल. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये जलसंधारण सप्ताहानिमित्त चित्रकला, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांना शाळांमध्ये आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाईल. एक शाळा एक खड्डा मोहीम या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शोषखड्डा तयार केला जाईल, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास थेट मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांच्या प्रचंड सहभागाबद्दल समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, पाणी हे केवळ निसर्गाची देणगी नसून ते मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे. पाण्याशिवाय सृष्टीचे अस्तित्व शक्य नाही. त्यामुळे पाणी अत्यंत अनमोल असून त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. माती अडवणे आणि पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ही वॉकेथॉन केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, यातून मिळालेली जलप्रबोधनाची प्रेरणा तळागाळापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे.
सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाणी बचतीच्या व संवर्धनाच्या घोषणा देत संपूर्ण शहर उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाले होते. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत नवीन जाणीव निर्माण झाली आहे. यावेळी उपस्थितांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली.






