
Sahyadri Tiger Reserve: सिंधुदुर्गातील पश्चिम घाट वाघ, ब्लॅक पँथर, किंग कोब्रा अशा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग (वाइल्डलाईफ कॉरिडॉर) आहे. याच भ्रमणमार्गात महाशिवरात्रीला एकाच दिवशी वाघ आणि ब्लॅक पँथरचे दर्शन अनेकांना घडले.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात जाताना आनंद गावडे यांना आंबोलीत वाघाचे दर्शन झाले. तर तेरवण – मेढे रस्त्यावर तेरवण येथील ग्रामस्थ आणि एका पत्रकाराला ब्लॅक पँथर दिसला. गेळे – आंबोली येथील मलय नावाने परिचित असलेल्या भागात लिंगाची राई आहे. या देवराईत असलेल्या महादेवाच्या प्राचीन स्थळाकडे जाताना स्थानिक ग्रामस्थ आनंद गावडे, नारायण लाड, अनिल सुतार, संदीप सुतार व आनंदची मावशी यांना कच्च्या रस्त्यालगतच्या झाडीत वाघ दिसला. त्यांच्यासमोर अगदी सात – आठ फुटांवर तो वाघ होता, प्रत्यक्ष वाघ बघून ते स्तिमित झाले. एक दीड मिनिटांनी सावरल्यावर त्यांनी त्याचे फोटोही काढले. अर्थात सर्वांसाठी हा अनुभव भीतीदायक व रोमांचकारीही होता.
Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड
सध्या सिंधुदुर्गात व्याघ्र गणना सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीसह वाघाचे दोन बछडेही कैद झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीतील जंगलभाग वाघांच्या प्रजननासाठी नैसर्गिक केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यातच रविवारी पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाले आणि वाघाचा अधिवास ठळक झाला. वन विभागाला आंबोलीत पिल्ले मोठी झाल्याने एकटी फिरणारी वाघीण दिसली होती, तीच ही वाघीण आहे की, दुसरा वाघ किंवा वाघीण आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही.
महाशिवरात्रीला दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील नागनाथ मंदिराकडून तेरवणला जाणाऱ्या रस्त्यावर काही ग्रामस्थ आणि एका पत्रकाराला सायंकाळी सहाच्या दरम्यान एक ब्लॅक पँथर दिसला. महाशिवरात्री उत्सवासाठी दोन्ही ठिकाणाहून शिवभक्तांची ये-जा सुरू असते. हा नवीन रस्ता पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) भाग असलेल्या पूर्ण जंगलातून जातो. या भागात गवे,हत्ती व अन्य वन्यप्राणी आढळतात. अधूनमधून बिबट्या, ब्लॅक पँथरचेही दर्शन घडायचे. रविवारी मात्र,पुन्हा एकदा ब्लॅक पँथरचे दर्शन अनेकांना झाले.
आंबोली परिसरात दिसलेला वाघ देवराईतील घनगर्द जंगलात आढळला. जंगले नष्ट झाल्याने बिबटे, वाघ, गवे, ब्लॅक पँथर, किंग कोब्रा मानवी वस्तीत येत आहेत. पूर्वी देवराई जपल्या जायच्या, आता त्या एकामागोमाग एक तोडल्या जात आहेत. त्या जपायला हव्यात;अन्यथा वस्तीत येण्याशिवाय वन्य प्राण्यांना दुसरा पर्यायच उरणार नाही.
गोवा आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणारा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर एकच आहे.पर्यावरण साखळीतील अत्यंत महत्वाचे घटक असलेले वन्यजीव वाचवायचे असतील, तर सह्याद्रीतील गोवा ते आंबोली हा वाइल्डलाईफ कॉरिडॉर जपण्याची गरज आहे.त्यासाठी दोन्ही राज्यांनी संयुक्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
नारायण गडाच्या वेशीवर जंगलात पूर्वी आमचे पूर्वज राहायचे. या देवराईत वाघ असतो,असे जुनी माणसे सांगायची. पण,रविवारी प्रत्यक्ष वाघ बघितला आणि धन्य झालो. अजूनही तो क्षण आणि रुबाबदार वाघ नजरेसमोरून जात नाही.
– आनंद गावडे, शिक्षक, लोणावळा.