पारगाव शिंगवे : राज्यात पाऊस न पडल्याने सोळा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. यामुळे पाणी तसेच जनावरांना चारा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. या दुष्काळी परिस्थितीत सर्व संकटांंना सामोरे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे गणेश चतुर्थी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सपत्नीक गणरायाचे दर्शन घेऊन आरतीचा मान स्वीकारला. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुर्वा वळसे पाटील, जि.प.माजी उपाध्यक्ष अरुण गिरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, पं.स.सदस्य रविंद्रजी करंजखेले, सरपंच बाळासाहेब मेंगडे, युवासेना जिल्हा समन्वयक सुनिल गवारी, गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत मेंगडे, उपाध्यक्ष भास्कर मेंगडे, जिजाभाऊ मेंगडे, भरत फल्ले, तुकाराम भोर, दिलीप रणपिसे, देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
-सातगाव पठार परिसरात दुष्काळी परिस्थिती
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, तालुक्यातील लोणी धामणी परिसरात तसेच सातगाव पठार परिसरात दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न उभे राहिले आहे. या दुष्काळी संकटांना सामोरे गेले पाहिजे आहे. यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांना सोबत घेऊनच मेंगडेवाडी देवस्थानला ‘क’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, शिरूर मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक गावागावात विकासाची कामे करण्यात आली. रात्रंदिवस मी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मेंगडेवाडी गावाच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
भविष्यात डिंभे धरणाच्या पाण्याचा अवघड प्रश्न उभा रहाणार आहे. डिंभे धरणाचे पाणी बोगदा पाडून हे पाणी माणिक डोह धरणात नेण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर डिंभे धरणातील पाणी साठा तीन महिन्यात संपून जाऊ शकतो.यामुळे नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा कसा करायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. या संदर्भात मी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. हा लढा एकट्याचा नसून सर्वांचा आहे. हे भविष्यातील मोठे अवघड संकट थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी माहिती दिलीपराव वळसे पाटील यांनी सांगितले.