मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आजची सुनावणी संपली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) यांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी बाजू मांडली. त्यानंतर आता याप्रकरणाची सुनावणी सदस्यांच्या घटनापीठाकडून सात सदस्यांच्या घटनापीठाकडे जाईल का? याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी बाजू मांडल्यानंतर राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने सुनावणी स्थगित करण्यात आली. त्यामुळे सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यांच्या घटनापीठाकडून सात सदस्यांच्या घटनापीठाकडे जाईल का? याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच त्यांनी नबाम रेबिया प्रकरणावरही महत्वाचं भाष्य केलं. याबरोबरच सत्तासंघर्षाची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठापुढे घेण्यात यावी, अशी मागणीही ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली.
उद्या पुन्हा सुनावणी
शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी नवे मुद्दे मांडत राज्यातील सत्तासंघर्षाचा घटनाक्रमच सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला. अजय चौधरी यांची गटनेते पदाची निवड बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा दावाही हरीश साळवे यांनी केला.
शिंदे यांचं सरकार घटनात्मक
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी बहुमताचा दावा केला. एकनाथ शिंदे हे राज्याचे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कारण शिंदे यांनी कायदेशीरपणे बहुमत सिद्ध केलं आहे. त्यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता. शिंदे गट आणि भाजपकडे बहुमत असल्यानेच ते मुख्यमंत्री झाले, असेही साळवे यांनी सांगितले.






