मंत्री उदय सामंत (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्नपडताळणी करण्याचे आदेश दिले जातील. तसेच मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाईल. बनावट प्रमाणपत्रास मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य सरोज अहिरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य नाना पटोले, वरूण सरदेसाई यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ११ दिव्यांग उमेदवारांची नायर हॉस्पिटल येथे पुनर्पडताळणी करण्यात आली. यामध्ये २ उमेदवारांचे दिव्यांगत्व प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांना अपात्र ठरवून नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. नाशिक महानगरपालिकेत भरती करण्यात आलेल्या हिंदी आणि उर्दू माध्यमातील दोन शिक्षकांकडे मात्र वैध दिव्यांग युनिक आयडी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक भरती ही ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. उमेदवारांची प्रवर्गानुसार कागदपत्र पडताळणी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत केली जाते. प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळल्यास उमेदवारास तत्काळ अपात्र ठरवले जात असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
उदय सामंतांची ठाकरेंवर खोचक टीका
“स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांची साथ जर ठाकरे गटाने सोडली असती, आणि ‘सामना’च्या अग्रलेखातून तसे स्पष्टपणे मांडले असते, तर कदाचित कुणीतरी त्याचा विचार केला असता,” अशा शब्दांत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. सामंत म्हणाले, “राहुल गांधी जगभर फिरून वाटेल त्या पद्धतीने सावरकरांवर टीका करतात. त्यांनी सावरकरांनी माफीनामा दिला आणि इंग्रजांसमोर शरणागती पत्करली, असा आरोप केला. अशा आरोपांना उत्तर देणे ‘सामना’ या मुखपत्रातून अपेक्षित होतं. पण तसे झाले नाही.”
Uday Samant News: …तर त्यांचा कुणीतरी विचार केला असता; उदय सामंतांची ठाकरेंवर खोचक टीका
ते पुढे म्हणाले, “ज्या लोकांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बसणं स्वीकारलं, त्यांना सावरकर यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सावरकरांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाचा वापर करून भावनिक राजकारण केलं जातं, पण त्यांच्या प्रतिमेचा अपमान करणाऱ्यांची साथसुद्धा स्वीकारली जाते. ही दुहेरी भूमिका योग्य नाही.”