सौजन्य - नवराष्ट्र टीम
चाकण : महाराष्ट्राची औद्योगिक ताकद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक परिसरातील वाढत्या समस्या आणि उद्योग स्थलांतराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकरवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्योग, रोजगार, औद्योगिक विजदर, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सरकारने केवळ गुंतवणुकीच्या घोषणा न करता प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती आणि उद्योगांना आवश्यक सुविधा देण्यावर भर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. चाकण येथे आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वाढता उत्पादन खर्च आणि महागडी औद्योगिक वीज यामुळे उद्योगांसमोर निर्माण झालेल्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असतील तर त्यामागची कारणे शोधणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘कागदावरच्या कंपन्या’ म्हणणे हास्यास्पद
चाकणसह महाराष्ट्रातील काही कंपन्या बंद होत असल्याबाबत ‘त्या कागदावरच्या कंपन्या होत्या’,असे वक्तव्य केले जात असेल तर ते हास्यास्पद आहे, अशी टीका पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयावर भाष्य करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. सरकारने संबंधित अधिकारी किंवा अभ्यासू व्यक्ती समोर आणावी. त्यांच्यासोबत या विषयावर खुली चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे आव्हानही पवार यांनी दिले.
मोठी गुंतवणूक, मात्र रोजगार किती?
राज्यात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक येत असल्याचा सरकारचा दावा असला तरी त्यातून प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण होणार, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर वीज आणि पाण्याची आवश्यकता असते; मात्र त्या तुलनेत रोजगारनिर्मिती कमी असेल तर अशा गुंतवणुकीचा राज्याला नेमका किती फायदा होतो, हा प्रश्न आहे. महाराष्ट्राला केवळ गुंतवणुकीचे मोठे आकडे नकोत, तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारे उद्योग आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘उद्योजक गुजरातकडे का वळत आहेत?’
महाराष्ट्रातील छोटे-मोठे उद्योजक गुजरातसह अन्य राज्यांमध्ये विस्तार का करत आहेत, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, असेही पवार म्हणाले. फक्त मोठ्या कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या घोषणा करून उद्योगांचे प्रश्न सुटणार नाहीत. स्थानिक उद्योजकांना पोषक वातावरण, स्पर्धात्मक वीजदर, चांगले रस्ते आणि सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक वीजदरावरून सरकारला सवाल
औद्योगिक वीजदराच्या मुद्द्यावरही पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. महाराष्ट्रात उद्योगांना सुमारे ११.५० ते १२.५० रुपये दराने औद्योगिक वीज मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. त्याउलट काही राज्यांमध्ये सुमारे साडेचार ते साडेपाच रुपये दराने वीज उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. वीजदरात एवढी मोठी तफावत असेल तर महाराष्ट्रातील उद्योगांनी येथेच का राहावे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. उत्पादन खर्च वाढत असताना महागड्या विजेमुळे महाराष्ट्रातील उद्योगांची स्पर्धात्मकता कमी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सोलार धोरणातील बदलांवरही टीका
सौरऊर्जा प्रकल्पांबाबतच्या धोरणात गेल्या काही महिन्यांत झालेल्या बदलांवरही पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उद्योगांनी सोलार प्लांटसाठी केलेली गुंतवणूक पूर्वी तीन-चार वर्षांत वसूल होण्याची शक्यता होती; मात्र आता ती गुंतवणूक सात-आठ वर्षांतही वसूल होत नसल्याचा दावा त्यांनी केला. सरकारच्या धोरणांमध्ये वारंवार होणारे बदल उद्योगांसाठी अडथळा ठरत असून, औद्योगिक धोरणात स्थिरता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘फेक नॅरेटिव्ह मी करत नाही’
‘फेक नॅरेटिव्ह मी करत नाही. कंपन्या महाराष्ट्र सोडून बाहेर जात आहेत,’ असा दावा करत पवार यांनी सरकारला खुल्या चर्चेचे आव्हान दिले. उद्योग स्थलांतरित होण्यामागील कारणांवर सरकारने खुली चर्चा करावी आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
विखे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेलाही पवार यांनी प्रत्युत्तर दिले. पवार साहेबांवर बोलण्यापूर्वी तलाठी भरतीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत आपण काय भूमिका घेणार, हे विखे पाटील यांनी स्पष्ट करावे, असा पलटवार त्यांनी केला.
चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी
दरम्यान, रोहित पवार यांनी चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडीच्या विविध ठिकाणांची पाहणी केली. चाकणमध्ये देश-विदेशातील अनेक कंपन्या कार्यरत असताना वाढती वाहतूक, अपुरे रस्ते, खड्डे आणि पायाभूत सुविधांवरील ताण यामुळे उद्योग, कामगार आणि स्थानिक नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी पाहणीदरम्यान नमूद केले. वाहतूक कोंडीचा थेट परिणाम उद्योगांच्या उत्पादनाच्या वेळापत्रकावर, मालवाहतुकीवर आणि कामगारांच्या वेळेवर होत आहे. त्यामुळे चाकणचा वाहतूक प्रश्न हा केवळ स्थानिक वाहतुकीचा प्रश्न नसून महाराष्ट्राच्या औद्योगिक भवितव्याशी निगडित असल्याचे पवार यांनी सांगितले.
‘उद्योगमंत्र्यांनी कामाच्या दिवशी चाकणमध्ये यावे’
उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी चाकणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत पवार यांनी त्यांना थेट आवाहन केले. उद्योगमंत्र्यांनी केवळ सुट्टीच्या दिवशी आणि पोलीस बंदोबस्तात पाहणी करण्याऐवजी एखाद्या कामाच्या दिवशी चाकणमध्ये यावे. कोणताही विशेष पोलीस बंदोबस्त न घेता प्रत्यक्ष वाहतूक कोंडीतून प्रवास करून त्यांनी परिस्थिती अनुभवावी. त्यानंतरच चाकणमधील उद्योग, कामगार आणि नागरिकांच्या समस्यांची खरी जाणीव त्यांना होईल, असे पवार यांनी सांगितले.
उद्योग व रोजगार वाचविण्यासाठी ठोस धोरणाची गरज
महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जाऊ नयेत, विद्यमान उद्योगांचा विस्तार महाराष्ट्रातच व्हावा आणि स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सरकारने दीर्घकालीन आणि ठोस औद्योगिक धोरण आखण्याची गरज आहे. गुंतवणुकीची घोषणा करताना त्या प्रकल्पातून किती रोजगार निर्माण होणार, स्थानिक उद्योजकांना त्याचा किती फायदा होणार आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष किती लाभ मिळणार, याचे मूल्यमापन सरकारने करावे. चाकणसारख्या औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक, वीजदर, रस्ते आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने सोडवले नाहीत, तर भविष्यात त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील रोजगारावर होऊ शकतो, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

