
मुंबई : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत (VBA) नुकतीच युती केली. त्यानंतर आता भाजप आमदार प्रसाद लाड (MLC Prasad Lad criticizes Uddhav Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेले आहे, त्यांनी केवळ आता एमआयएमसोबत (MIM) युती करणे बाकी ठेवले आहे, अशा शब्दांत टोला लगावला.
सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मुंबईत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये लाड यांनी ही मागणी केली. प्रसाद लाड म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील हा मोर्चा आहे. हे हिंदू राष्ट्र व्हावे ही आमची मागणी आहे. विधान परिषद आणि
विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करणार आहोत, महिलांच्या हिताचा हा मोर्चा आहे, असे सांगतानाच लव्ह जिहादला विरोध आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
हिंदूंनी जागे व्हावे : नितेश राणे
महाराष्ट्रातील हिंदू जागा होतोय. हिंदूनी एकत्र येऊन संदेश देणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षात हिंदूंवर अत्याचार होत आहे. हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. हिंदूंची संख्या कमी होईल याचा प्रयत्न झाला. मुंबईतील हिंदूंना घरातून पलायन करावे लागले, या सर्व प्रकाराला एकच उत्तर आहे. ते म्हणजे हिंदूंनी जागे व्हावे. आमच्या विरोधात येणाऱ्यांविरोधात आम्ही लढू शकतो हे सांगण्याची गरज आहे. त्यासाठी हा मोर्चा निघणे हा ऐतिहासिक क्षण आहे, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.