
वसई/निलेश महाडीक : आखाती देशात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा देशभरात जाणवायला लागला. सर्वसामान्य देखील यात भरडले जात असून आता इंधन तुटवडा आणि दरवाढीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. घरगुती गॅसच्या तीव्र टंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वसई तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. हातात रिकामे सिलिंडर घेतला आणि नागरिकांनी थेट रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखली. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनाची तीव्रता स्पष्ट दिसून येते. मोठ्या संख्येने महिला व नागरिक महामार्गावर जमा झाले होते. “गॅस द्या, अन्यथा रास्ता रोको” अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही आंदोलकांनी रिकामे सिलिंडर रस्त्यावर ठेवून निषेध नोंदवला, तर काहींनी प्रशासनाला थेट जबाबदार धरत संताप व्यक्त केला.गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक कुटुंबांना १०-१५ दिवस सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत असल्याने स्वयंपाकघर बंद पडण्याची वेळ आली आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसत असून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
महामार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “आधी गॅस, मगच रस्ता मोकळा” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतल्याचे दिसून आले.आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, तातडीने गॅस पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. “आमच्या घरात चुली विझल्या आहेत आणि प्रशासन मात्र आश्वासनांमध्ये गुंतले आहे,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.एकूणच, गॅस टंचाईचा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करत असून तो थेट रस्त्यावर उतरलेल्या जनआक्रोशात बदलला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर अशा आंदोलनांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.