
गुडघाभर खड्डे, पावसाचे पाणी अन् जीवघेणा प्रवास; व्याहाळी-धोम रस्त्याबाबत नागरिकांचा संताप
या अपूर्ण रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या मार्गावरून चालणेही कठीण झाले असून दुचाकीस्वार रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या रस्त्यावर मुरूम टाकणे, खडीकरण करणे किंवा कोणतीही देखभाल करण्याचे सौजन्यही संबंधित विभागाने दाखवले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हा रस्ता पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारा जीवनदायी दुवा असून शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार आणि सामाजिक नातेसंबंध टिकवून ठेवण्यात त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. मात्र केवळ प्रशासकीय अडेलतट्टूपणामुळे हजारो नागरिकांना रोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विकासाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या यंत्रणेने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे या परिसरात पर्यटनासाठी राज्यासह विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहून अनेक पर्यटक या मार्गाने जाणे टाळत असल्याचे चित्र आहे.
परिणामी स्थानिक पर्यटन, रोजगार आणि व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. लहान वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक ठरला असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी केवळ कागदोपत्री अडथळे निर्माण करण्याऐवजी प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याला तातडीने परवानगी द्यावी, कालव्यालगतच्या उर्वरित रस्त्याच्या कामास मंजुरी देऊन संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी पश्चिम भागातील नागरिकांकडून होत आहे. आता तरी पाटबंधारे विभाग जागा होणार का, की एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला खडबडून जाग येणार, असा संतप्त सवाल पश्चिम भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.
हा रस्ता धरण निर्माण झाले त्या 1972 सालापासून कार्यरत आहे हा रस्ता धरणाच्या दोन्ही टोकांना जोडण्याचा दुवा ठरतो या दोन्ही टोकाच्या नातेसंबंधांना जोडण्याचा महत्त्वाचा दुवा मानला जातो या रस्त्याने मोठ्या प्रमाणात दळणवळण होत असते या रस्त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते पुरणत काळातील धोम येथील मंदिरे पाहण्याकरता पर्यटक मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात पर्यटक याच रस्त्याचा अवलंब करता त्यामुळे पाटबंधारे विभागाने याला तूर्ताच परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया सचिन मानकुंबरे व्याहळी ग्रामस्थ यांनी दिली.
दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक