
शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
२ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव-दादेगाव रस्त्यालगत रंजित रवी ढहाळे याच्या राहत्या घराशेजारील खोलीवर छापा टाकला. तेथून संतोष एकनाथ जाधव वय ४६, रा. भगतसिंग चौक, शेवगाव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून हिरा पान मसाला, रॉयल आणि रत्ना तंबाखू असा एकूण ५६,९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
परंतु, शेवगाव शहरातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याचा साठा होता. प्रत्यक्षात कारवाई खूप मोठी आणि लाखो रुपयांची असताना, पोलिसांनी केवळ ५६ हजार ९१२ रुपयांचाच मुद्देमाल दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
“कारवाईदरम्यान आणि कारवाईनंतर अनेक बड्या राजकीय नेत्यांचे फोन पोलिसांना आले होते. या राजकीय दबावामुळेच एलसीबीच्या पथकाने नरमाईची भूमिका घेत मोठी कारवाई अत्यंत छोटी करून दाखवली. उर्वरित मालाचे आणि आरोपींचे काय झाले?” असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.
या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ५५७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुख्य सूत्रधार आणि मोठ्या माशांना वाचवण्यासाठीच हा कायदेशीर डावपेच आखण्यात आला का, अशी शंका घेतली जात आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलत असताना, दुसरीकडे त्यांचेच ‘एलसीबी’ पथक राजकीय दबावाला बळी पडून कारवाई ‘मॅनेज’ करत असेल, तर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन कसे होणार? असा तिखट सवाल आता शेवगावकर उपस्थित करत आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष घालून चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.