
सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि घाटमाथ्यावरील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नद्या, ओढे आणि धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!
दरम्यान, विदर्भातही ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे, झाडे कोसळणे तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून किनारपट्टी भागात विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नैऋत्य मान्सूनने देशभरात आणखी वेग घेतला असून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये तसेच राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये मान्सूनची पुढील वाटचाल झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर कोकण, गुजरात प्रदेश आणि सौराष्ट्र-कच्छ परिसरात मान्सून सक्रिय असून या भागांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.