
म्हसवड पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासुन शहराला सायपन पध्दतीने पाणी पुरवठा केला जातो, या योजनेसाठी राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्र शासनाच्या २.० योजनेंतर्गत सुमारे ८० कोटींचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करुन दिलेला आहे. निधी प्राप्त होताच नुतन कामाचा धडाका गत दोन वर्षापासुन सुरु आहे, या योजनेची नूतन जलवितरण नलिका पालिका हद्दीत सर्वत्र टाकण्यात आलेली आहे, मात्र योजनेच्या पाणी साठवण तलावापासुन ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत या योजनेच्या टाकण्यात आलेल्या नुतन जलवाहिनीला वारंवार गळती लागल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होवुन शहराला पिण्याचे पाणी १५ दिवसांतुन एकवेळ म्हसवडकरांना सध्या मिळत आहे.
यामुळे अगोदरच म्हसवडकर जनता अगोदरच पाण्यासाठी त्रस्त झालेली आहे जनतेची ही ओरड राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ऐकुन सदर पाणी योजनेस गत अठवड्यात भेट देवुन सर्व कर्मचारी व अधिकार्यांसह पदाधिकार्यांना कडक शब्दात सुचना देत शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे फर्मान काढले, मंत्री महोदयांचा आदेश शिरस्त्नानी मानुन पालिकेकेतील त्यांच्या शिलेदारांनी अहोरात्र कष्ट करुन शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत केला, नुतन जलवाहिनीतुन पाणी एकवेळ म्हसवडकरांना सोडले मात्र ते पाणी अतिशय खराब आल्याने म्हसवडकरांची तहान काही भागलीच नाही, परिणामी म्हसवडकरांची पाण्याची ओरड आजही कायम आहे.
विशेष म्हणजे जलशुध्दीकरण केंद्रापासुन ते शहरातील विविध भागातील पाण्याच्या टाक्यांपर्यंत हे पाणी सायपन पध्दतीने नेले जात आहे, त्या पाण्याची नुतन जलवाहिनी ही जमीनीखालुन नेली आहे, काल दि.२६ रोजी सकाळी याच जलवाहिनीला गळती लागुन त्याद्वारे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने अगोदरच पाण्याचा दुष्काळ त्यात हा १३ वा महिना असाच काहीसा प्रसंग येथे निर्माण झाला आहे, त्यामुळे याचा थेट परिणाम पुन्हा एकदा पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होईल अशी भिती आता म्हसवडकर जनता व्सक्त करीत असुन लवकरात लवकर हा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी अपेक्षा सामान्य म्हसवडकर जनता करीत आहे.
जर ट्रायल टप्प्यातच अशा प्रकारच्या त्रुटी समोर येत असतील तर भविष्यात योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा कितपत सक्षम राहील, हा मोठा प्रश्न आहे. “इतक्या मोठ्या खर्चाच्या योजनेत सुरुवातीलाच अशा अडचणी येत असतील तर पुढे पुन्हा जुन्याच समस्यांना सामोरे जावे लागेल का?” अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
दरम्यान, शहरातील अनेक भागात आधीच पाणी उशिरा पोहोचत असल्याने नागरिकांना टँकर, विहिरी आणि पर्यायी साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे नवीन योजनेचे काम लवकर पूर्ण करून तांत्रिक दोष दूर करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या या घटनेमुळे शहरातील नागरिकांचे लक्ष या योजनेच्या गुणवत्तेकडे लागले असून, दुरुस्तीनंतर योजना किती परिणामकारकपणे कार्यान्वित होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबतीत म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर जलवाहिनीवरील काम युध्द पातळीवर सुरु असुन आज रात्री पर्यंत या जलवाहिनीतुन पाणी पुरवठा पुन्हा जोमात सुरु होईल असे सांगितले.