आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप
हे सर्व युवक कर्दे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. या अपघातात सर्व आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्सच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत कठीण परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले.
मृतांपैकी पाच युवक आसगाव येथील असल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. मध्यरात्री उशिरा मृतदेह गावात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. गावातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. त्यानंतर दोन ट्रॅक्टर ट्रॉलींमधून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले आणि एकाचवेळी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मर्ढे येथील दोन तरुणांवर तसेच खटाव येथील एका युवकावर पहाटेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अश्रुपूर्ण निरोप दिला. या दुर्दैवी घटनेने सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.






