
येरळवाडी धरणात फक्त 25 टक्के मृत पाणी साठा शिल्लक; वडूजसह अनेक गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर
वडूज / डॉ. विनोद खाडे : मागील वर्षी जून महिन्यात तूफान पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यावेळी सर्व नद्या, तलाव पाण्याने संपूर्ण भरून गेले होते. यावर्षी मात्र जून महिना काही अपवाद वगळता कोरडा गेला आणि आता तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी कमतरता भासू लागली आहे. खरं तर कधी काळी दुष्काळी खटाव तालुका म्हटलं जायचं. ते आता मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातुन उरमोडी, तारळी, टेम्बू चं पाणी आल्यामुळे दुष्काळी कलंक पुसत चालला आहे.
खटाव तालुक्याची राजधानी असणाऱ्या वडूज शहराला व बहुतांशी गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या येरळवाडी तलावाने तळ गाठला असून, तलावात फक्त २५ ते ३० टक्के मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चर काढून तसेच तलावाच्या मध्यभागी मोटार टाकून पाणी घेतले जात आहे. मृत साठ्यामुळे नागरिकांना गढूळ पाणी मिळत आहे. धरणात मृत पाणी साठा राहिल्याने वडूजसह आसपासच्या अनेक गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येरळवाडीतील पाण्याच्या मृत साठ्यामुळे प्रशासनाने कडक पाणी उपसाबंदी लागू केली आहे.
येरळवाडी १५५, अंबवडे ७७, बनपुरी ६३, नढवळ ३८, कातरखटाव २४, गणेशवाडी ७, पिंपरी ६, गुरसाळे ४. निमसोड २, सूर्याचीवाडी २. मानेवाडी ४ ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. धरण परिसरात महसुल, पोलीस व जलसंपदा विभागाकडून संयुक्तपणे गस्त घालून तपासणी करण्यात येणार आहे. येरळा नदीसह गावोगावचे पाझर तलाव, विहिरी, कूपनलिका कोरडे पडले आहेत. आता पावसाची बारीक झिरझिर सुरु झाली आहे. अद्याप एकही दमदार पाऊस झाला नसल्याने येरळा नदी कोरडी पडली आहे.
तलावात पाणीसाठा दर्शवणाऱ्या पट्ट्याही उघड्या
तलावात पाणीसाठा दर्शविणाऱ्या पट्ट्याही पूर्णतः उघड्या पडल्या आहेत. तलावात शिल्लक असणारे पाणी तलावाच्या पायथ्यापासून दूरपर्यंत गेले आहे. एक दोन आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक गावांच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत येरळवाडी, कानकात्रे, पळसगाव, सूर्याचीवाडी, कलेढोण (कटकाळी तलाव), विखळे कटकाळी तलाव,कोरडे पडले आहेत.
बहुतांश ठिकाणी पाणी परिस्थिती सुरळीत
मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून तलावात उरमोडीचं पाणी मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आल्याने बहुतांश ठिकाणी पाणी परिस्थिती सुरळीत राहिली. तर पाचवड, तरसवाडी तलाव, येळीव, दरुज दरजाई तलाव, पेडगाव तलाव, वाकेश्वर बंधारा व वडूज येथील बंधारा कोरडे पडले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत एक टक्का सुद्धा पाऊस न पडता यंदा जून महिना पूर्ण पणे कोरडा गेला आहे. उर्वरित तीन महिन्यात अशा परिस्थितीत पाऊस मोठ्या प्रमाणात पडणं आवश्यक आहे.