उन्हाळ्याची चाहूल लागताच वाशिम शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. शहराची तहान भागविण्यासोबतच परिसरातील शेती सिंचनासाठी महत्त्वाचा असलेल्या एकबुर्जी जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने घटत असून सध्या केवळ ६५ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही स्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
सुमारे ५५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला हा प्रकल्प शहरासाठी जीवनरेखा मानला जातो. या जलाशयावर वाशिमकरांचा पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार असून परिसरातील शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था देखील याच प्रकल्पावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दशकांत शहराचा झपाट्याने झालेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध जलसाठा अपुरा पडू लागला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे जलाशय भरला असला तरी पाणीवाटपाच्या नियोजनाअभावी पाण्याचा अनियंत्रित वापर झाल्याचे चित्र दिसत आहे.
दररोज शहरासाठी होणारा पाणीपुरवठा आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर होणारा पाणी उपसा यामुळे जलसाठा वेगाने कमी होत आहे. याशिवाय उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाष्पीभवनाची प्रक्रिया देखील सुरू झाली असून त्यामुळे पाणीपातळी आणखी घटण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने याची दखल घेत पाणी वितरणाचे काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
नगराध्यक्ष अनील केंदळे यांनीही नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सिंचनासाठी होणाऱ्या अनियंत्रित पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याचेही समोर येत आहे. काही घरांमध्ये नळांना तोटी नसल्यामुळे पाणी सतत वाहून जात आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनासह नागरिकांनीही लक्ष देणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, पाणीटंचाई टाळण्यासाठी केवळ प्रशासनाचे नियोजन पुरेसे नसून नागरिकांनीही पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
High Court: संमतीने असलेले शारीरिक संबंध ‘टॉर्चर’ ठरत नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाने तरुणांविरुद्धचा POCSO खटला केला रद्द
दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. योग्य वेळी ठोस पावले उचलली नाहीत, तर यंदाही वाशिमकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.




