१५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
१ जून २०२२ ते १६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ग्रामपंचायत करजखेडा येथे १५ व्या वित्त आयोगातून विविध विकासकामांसाठी ४,२०,००० रुपये प्राप्त झाले होते. या निधीचा विनियोग ग्रामविकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामांसाठी होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लेखापरीक्षण व प्राथमिक चौकशीदरम्यान आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
या प्रकरणी फिर्यादी संजय संतराव ढाकणे (वय ५५), विस्तार अधिकारी, पंचायत समिती धाराशिव, रा. दैत्यकृपा कॉलनी, शाहूनगर, धाराशिव यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रथम खबर दिली. त्याअनुषंगाने आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०९ (विश्वासघाताने अपहार), ४२० (फसवणूक) व ३४ (सामूहिक हेतू) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कलम ४०९ अंतर्गत सार्वजनिक सेवकाकडून विश्वासघाताने निधीचा अपहार केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे, तर कलम ४२० अंतर्गत फसवणुकीसाठी दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते.
पोलिसांकडून संबंधित कागदपत्रे, बँक व्यवहार, मंजूर कामे व प्रत्यक्षात झालेली कामे यांची पडताळणी करण्यात येत असून ग्रामपंचायतीच्या इतर व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






