
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ८३.६८% साठा! पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तरी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अद्याप नाही
मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागाने २५ जुलै रोजी सकाळी ६.०० वाजता जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, मुंबईला दररोज पाणी पुरवणाऱ्या सातही महत्त्वाच्या तलावांमध्ये मिळून एकूण क्षमतेच्या ८३.६८ टक्के म्हणजेच तब्बल १२ लाख ११ हजार १८८ दशलक्ष लिटर उपयुक्त जलसाठा जमा झाला आहे. तलावांमधील पाणी पातळी समाधानकारकरित्या वाढली असली तरी, प्रशासनाकडून अद्याप पाणीकपातीबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असला तरी, मुंबईकरांना पाणीकपातीबाबतच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.(फोटो सौजन्य – istock)
तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा
गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. या काळात भातसा धरण क्षेत्रात सर्वाधिक १५९ मिमी पावसाची नोंद झाली, तर अप्पर वैतरणा क्षेत्रात १३१ मिमी, मिडल वैतरणात ९३ मिमी, तानसामध्ये ९० मिमी आणि मोडक सागरमध्ये ८४ मिमी पाऊस झाला. भांडुप कॉम्प्लेक्स येथे २४ तासांत १२ मिमी पाऊस झाला असून या मोसमातील एकूण पाऊस २,२१४ मिमीवर पोहोचला आहे.
मागील वर्षी २५ जुलै रोजी तलावामध्ये ८७.२१ टक्के जलसाठा होता, तर २०२४ मध्ये याच दिवशी ६६.७७ टक्के साठा होता. मुंबईला वर्षभरासाठी एकूण सुमारे १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. जुलै महिन्यातच ८३ टक्क्यांहून अधिक साठा जमा झाला असला तरी, महापालिका पाणीकपात रद्द करण्याबाबत काय आणि कधी निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे सातपैकी चार प्रमुख धरणे ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागली आहेत. यामध्ये विहार आणि तुलसी तलाव सर्वात आधी म्हणजेच ७ जुलै रोजी ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर तानसा तलाव २२ जुलै रोजी सकाळी ८:५१ वाजता भरून वाहू लागला, तर मोडक सागर धरण २३ जुलै रोजी पहाटे २:०७ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. सध्याच्या स्थितीनुसार मोडक सागर, विहार आणि तुलसी या तिन्ही तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून तानसा तलाव ९८.४५ टक्के भरला आहे. तसेच मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवणाऱ्या भातसा धरणात ८२.६८ टक्के, मिडल वैतरणामध्ये ८०.७३ टक्के आणि अप्पर वैतरणामध्ये ६८.११ टक्के साठा जमा झाला आहे.