
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेता ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती त्याने स्वतः दिली आहे. यासोबतच त्याने लग्नसोहळा कसा असणार, याचाही खुलासा केला आहे.
‘प्रीतम अँड पेड्रो’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना आमिर खान म्हणाला की, गौरीसोबतचा विवाहसोहळा अत्यंत साधा आणि खासगी असेल. या समारंभाला फक्त दोन्ही कुटुंबांतील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.
आमिर म्हणाला, “हो, माझं लग्न ५ जुलैला आहे आणि ते अगदी छोटंसं लग्न असेल. आम्ही ते घरीच करत आहोत. फक्त आमची दोन्ही कुटुंबं आणि काही मित्र-मैत्रिणी उपस्थित असतील. हा आमच्यासाठी खूप खास दिवस आहे. आम्हाला सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची गरज आहे. कृपया आमच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करा.”
गेल्या वर्षी मार्चमध्ये, आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आमिर खानने गौरी स्प्रॅटची माध्यमांशी अधिकृत ओळख करून दिली होती. त्यानंतर त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली.
आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचं पहिलं लग्न रीना दत्ता यांच्यासोबत झालं होतं. या विवाहातून त्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत. त्यानंतर २००५ मध्ये त्याने दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी विवाह केला. डिसेंबर २०११ मध्ये सरोगसीद्वारे त्यांचा मुलगा आझाद राव खानचा जन्म झाला. २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजही दोघे मिळून मुलाच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडत आहेत.
दरम्यान, अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान, त्याची पहिली पत्नी रीना दत्ता, माजी पत्नी किरण राव, मुलगा आझाद आणि गौरी स्प्रॅट एकाच गाडीतून प्रवास करताना दिसत आहेत. या व्हिडिओचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.