
( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)
‘घूम है किसीके प्यार में’ फेम अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि अभिनेता आदित्य कपाडिया यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर या सेलिब्रिटी जोडप्याने परस्पर संमतीने विभक्त होण्याची घोषणा केली आहे. तन्वीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.
तन्वीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. बराच विचार केल्यानंतर तिने आणि आदित्यने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक निर्णयांपैकी एक असल्याचे तिने म्हटले आहे.
अभिनेत्रीने पुढे स्पष्ट केले की, हा निर्णय पूर्णपणे परस्पर संमतीने घेण्यात आला असून त्यांच्या नात्यात कोणतीही कटुता नाही. “या निर्णयामागे कोणताही वाद किंवा नाट्य नाही. आम्ही एकमेकांचा आणि आमच्या कुटुंबियांचा आदर राखत हा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा,” अशी विनंतीही तिने केली.
कशी झाली होती दोघांची भेट?
तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांची पहिली भेट ‘एक दुसरे से करते हैं हम प्यार’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१३ मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी कोर्ट मॅरेज करत त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. या जोडप्याला एक मुलगाही आहे.
दोघांचं करिअर
तन्वी ठक्करने ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘घूम है किसीके प्यार में’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तर आदित्य कपाडिया ‘जस्ट मोहब्बत’, ‘शाका लाका बूम बूम’, ‘एक दुसरे से करते हैं हम प्यार’, ‘बडे अच्छे लगते हैं’ आणि ‘कोड रेड’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने हिंदीबरोबरच गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे.
तन्वी आणि आदित्य यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.