( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)
भारतीय लोककला विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. प्रख्यात पांडवानी गायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजन बाई यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीजन बाई गेल्या अनेक आठवड्यांपासून रायपूर एम्समध्ये दाखल होत्या आणि त्यांची प्रकृती गंभीर होती. आज पहाटे ३:१५ च्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली, त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने छत्तीसगड आणि संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
तीजन बाईंच्या निधनावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले, “प्रसिद्ध पांडवानी गायिका तीजन बाईजींच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणाने छत्तीसगडच्या या लोककलेला जगभरात एक वेगळी ओळख दिली. त्यांचे निधन हे कला आणि संस्कृती जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती!”
१९५६ साली छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील गनियारी गावात जन्मलेल्या तीजन बाईंचे जीवन हे संघर्ष आणि दृढनिश्चयाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. त्यांनी ‘पांडवानी’ (महाभारताची पारंपरिक कथात्मक गायनशैली) या लोककलेचे केवळ जतनच केले नाही, तर तिला एक नवीन आयामही दिला.
ज्या काळात पांडवानी कलेवर पारंपरिकरित्या पुरुषांचे वर्चस्व होते, त्या काळात तीजन बाईंनी ‘कापालिका’ शैलीचा स्वीकार केला. सुरुवातीला त्यांना मोठ्या सामाजिक विरोधाचा आणि निर्बंधांचा सामना करावा लागला.आपला दमदार आवाज, प्रभावी अभिनय, अतुलनीय सादरीकरण कौशल्य आणि हातातला तानपुरा यांमुळे रंगमंचावरील त्यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
तीन पद्म पुरस्कार, परदेशातील सन्मान… जेव्हा तीजन बाईंना दोन वेळच्या जेवणाची गरज होती
पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी छत्तीसगडच्या या कलाप्रकाराला केवळ देशातच नव्हे, तर आशिया आणि युरोपसह जगाच्या अनेक भागांमध्ये प्रोत्साहन दिले आहे. सुरुवातीच्या काळात सामाजिक अडथळे आणि विरोधाला न जुमानता, त्यांनी पांडवाणीचे जतन केले आणि तिला लोकप्रिय केले. त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि भारताच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरांपैकी एकाला जागतिक ओळख मिळवून देण्यास मदत केली.






