
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
या ट्रेलरमधून भारतीय सैन्याच्या शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीची अद्वितीय कहाणी उलगडताना दिसते. अगस्त्य नंदा यात परमवीर चक्र विजेता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारत असून, त्याचा जोश, आत्मविश्वास आणि देशासाठी असलेलं समर्पण प्रेक्षकांच्या मनाला भिडतं.
हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित असल्याचे समजते आणि यात एका तरुण सैनिकाच्या धैर्य, त्याग आणि देशसेवेच्या प्रेरणादायी प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन, भावना आणि देशभक्तीचा सुंदर संगम दिसतो, ज्यामुळे ‘इक्कीस’ हा वर्षातील सर्वात चर्चेत असलेला चित्रपट ठरू शकतो.
ट्रेलरच्या सुरुवातीलाच भारतीय सैन्यातील एक जवान आपलं वचन निभावताना दिसतो. तो म्हणतो की, “पुढच्या वर्षी माझ्या रेजिमेंटसाठी परमवीर चक्र मी घेऊन येईन”. यानंतर ट्रेलरमध्ये अंगावर काटा आणणारे अनेक प्रसंग प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात.
अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत असून, तो परमवीर चक्र विजेता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारतोय. चित्रपटात शौर्य, पराक्रम आणि देशभक्तीबरोबरच एक हृदयस्पर्शी प्रेमकथा देखील पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या पुढील भागात अगस्त्यचा सैनिकी प्रशिक्षणाचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
हा चित्रपट भारताच्या सर्वात तरुण परमवीर चक्र विजेता सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांच्या सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.