
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रणवीर सिंगचा धुरंधर २ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक ब्लॉकबास्टर चित्रपटाचे रेकार्ड मोडले असून धुरंधर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही चांगली कामगिरी करत आहे. अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटाचे कौतुक केले असले तरी, काहींनी त्यावर टीकाही केली आहे. चित्रपटावर टीका करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
केरळमध्ये ९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी शनिवारी येथे एक सभा घेतली. केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील थिरुवल्ला येथे झालेल्या एनडीएच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ‘धुरंधर’, ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांवर भाष्य केले.
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस, यूडीएफ आणि एलडीएफ यांना प्रत्येक गोष्टीवर खोटे बोलण्याची सवयच झाली आहे. जेव्हा ‘धुरंधर’ चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ते खोटे आहे असे म्हणू लागले. जेव्हा ‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित झाली, तेव्हा ते खोटे आहे असे म्हणू लागले. जेव्हा ‘द काश्मीर फाईल्स’ प्रदर्शित झाली, तेव्हा ते खोटे आहे असे म्हणू लागले.” ते पुढे म्हणाले, “समान नागरी संहितेबद्दल (UCC) देखील अशाच प्रकारची खोटी माहिती पसरवली जात आहे.”
धुरंधर चित्रपट
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ हे स्पाय थ्रिलर आहेत. भारताविरुद्धचे कट उधळून लावण्यासाठी पाकिस्तानला गेलेल्या एका भारतीय गुप्तहेराची कथा यात सांगितली आहे. ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंगने एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘धुरंधर’ ५ डिसेंबर २०२५ रोजी, तर ‘धुरंधर २’ १९ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित झाला.
“द केरळ स्टोरी” चित्रपट
“द केरळ स्टोरी” हा चित्रपट ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला. सुदीप्तो सेन दिग्दर्शित हा चित्रपट, इस्लाम धर्म स्वीकारलेल्या आणि आयसिसमध्ये भरती झालेल्या मुलींची कथा सांगतो. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. याचा सिक्वेल, “द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड,” फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रदर्शित झाला.
द काश्मीर फाईल्स चित्रपट
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. यात १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या निर्गमनाचे चित्रण आहे. यात मिथुन चक्रवर्ती आणि अनुपम खेर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
‘धुरंधर २’ च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएलची क्रेझ असूनही, या चित्रपटाने देशात १७ दिवसांत ९८५.०२ कोटींची निव्वळ कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटाने जगभरात १,५६४.३० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३५ हून अधिक विक्रम मोडले आहेत. रणवीर सिंग व्यतिरिक्त, या चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पांडोर आणि दानिश इक्बाल यांच्याही भूमिका आहेत.