फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता गौरव खन्ना आणि पत्नी आकांक्षा चमोला यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत आकांक्षाने नुकताच खुलासा केला होता. आता या प्रकरणावर गौरव खन्नाने पहिल्यांदाच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली आहे.
गौरव म्हणाला, “प्रेम आजही तितकंच आहे आणि माझा पाठिंबाही तितकाच आहे. मी तिच्या कायम पाठीशी उभा राहीन. ती माझी पत्नी आहे. मी तिच्यावर प्रेम केलं आहे रे, तर आता तिची साथ कशी सोडू?” त्याच्या या वक्तव्याने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
यासोबतच गौरवने घटस्फोटाच्या घोषणेनंतरची पहिली सोशल मीडिया पोस्टही शेअर केली. आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधील काही फोटो पोस्ट करत त्याने #LoveAlways असा हॅशटॅग वापरला. तसेच मुंबईत माध्यमांसमोर हसतमुखाने येत त्याने चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले आणि हार्ट साइनही दाखवला. मात्र, वेगळे होण्यामागील कारणांवर भाष्य करण्याचे त्याने टाळले. दरम्यान, आकांक्षा चमोलाने ‘Lock Upp: Sach Ya Sazaa’ या शोमध्ये दोघे गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत असल्याचा खुलासा केला होता. तिने सांगितले की, दोघांमध्ये कोणताही वाद किंवा कटुता नाही आणि आजही ते एकमेकांशी संवाद साधतात.
नंतरच्या भागात आकांक्षाने त्यांच्या नात्याबाबत अधिक खुलासा करत सांगितले की, आयुष्यातील ध्येये वेगळी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. गौरवला भविष्यात मूल हवे होते, तर तिला मातृत्व स्वीकारायचे नव्हते. या भिन्न विचारांमुळे दोघांना आपण जीवनसाथी म्हणून एकमेकांसाठी योग्य नसल्याची जाणीव झाली. मात्र, वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही दोघांमध्ये परस्परांविषयी आदर आणि जिव्हाळा कायम असल्याचे तिने स्पष्ट केले.






