फोटो सौजन्य - Social Media
व्यावसायिक केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत हिने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सिया गोयलच्या वडिलांनी मुलीविरोधात केलेल्या कठोर वक्तव्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, मुलांच्या कृतींसाठी त्यांच्या पालकांना दोष देता येत नाही, असे मत मांडले. आजच्या डिजिटल युगात मुलांवर सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बाह्य वातावरणाचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे केवळ कुटुंब किंवा पालक पाहून मुलांचे संस्कार ठरवणे योग्य नसल्याचे तिने म्हटले.
सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, “जर माझ्या मुलीनेच केतनची हत्या केली असेल, तर ज्या किल्ल्यावरून केतन खाली पडला, त्याच किल्ल्यावरून तिलाही खाली ढकललं पाहिजे,” अशी कठोर भूमिका मांडली होती. या वक्तव्याची बातमी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कंगनाने त्यावर प्रतिक्रिया दिली. कंगनाच्या मते, आजच्या काळात एखाद्या मुलाचे घर, कुटुंब किंवा पालक पाहून त्याच्या नैतिक मूल्यांचा अंदाज लावणे शक्य नाही. त्याऐवजी त्या व्यक्तीवर कोणाचा प्रभाव आहे, ती कोणासोबत वेळ घालवते, सोशल मीडिया, AI किंवा प्रत्यक्ष आयुष्यातील कोणत्या गोष्टी तिच्या विचारांवर परिणाम करतात, हे अधिक महत्त्वाचे आहे.
तिने पुढे नमूद केले की, अनेक जण प्रत्यक्ष आयुष्याबरोबरच सोशल मीडियावर वेगळी प्रतिमा तयार करून जगत असतात. लोक स्वतःबद्दल आकर्षक आणि स्वीकारार्ह प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यामागील वास्तव अनेकदा वेगळं असतं. त्यामुळे एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या कृतींसाठी त्यांच्या पालकांना किंवा संपूर्ण कुटुंबाला जबाबदार धरणे योग्य नाही, असे कंगनाने स्पष्ट केले. दरम्यान, १८ जून रोजी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र, तपासादरम्यान या प्रकरणाने कथित हत्येचे वळण घेतले. या प्रकरणात केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांची नावे समोर आली आहेत.
या घटनेनंतर सिया गोयलच्या पालकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रवीण गोयल यांनी केतनला स्वतःच्या मुलाप्रमाणे मानत असल्याचे सांगत, दोषी कोणताही असो, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली. तसेच मुलीने लग्नाबाबत कधीही नाराजी व्यक्त केली नव्हती, असा दावाही त्यांनी केला.
मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात वेगळेच संकेत समोर आले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सिया गोयल लग्नाबाबत साशंक होती, तर केतनने तिच्या आक्षेपांनंतरही लग्नाचा निर्णय बदलला नव्हता. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी डिजिटल पुरावे, लोकेशन डेटा आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे ही घटना अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, चेतन चौधरीच्या वडिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपल्या मुलाला या प्रकरणात विनाकारण गोवले जात असल्याचा दावा केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून सर्व तांत्रिक आणि इतर पुराव्यांची सखोल छाननी करण्यात येत आहे.






