
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘धुरंधर २’ या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने आठ दिवसांत ही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. हा एक बॉक्स ऑफिसवर यशस्वी चित्रपट आहे. दरम्यान, ध्रुव राठीसारखे यूट्यूबर्स सोशल मीडियावर उघडपणे चित्रपटावर टीका करत आहेत. नुकतेच, ध्रुव राठीने एका व्हिडिओमध्ये ‘धुरंधर २’ ला वाईट चित्रपट म्हणत त्यावर निशाणा साधला.
ध्रुव राठीने यूट्यूबवर ‘धुरंधर २ एक्सपोज्ड’ नावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आदित्य धरच्या चित्रपटावर निशाणा साधला आहे. ध्रुव राठी व्हिडिओमध्ये म्हणतो की, हा चित्रपट देशाचा अपमान करतो आणि नागरिकांचा दर्जा कमी करतो. आदित्य धरने व्हॉट्सॲप फॉरवर्ड मेसेजेस वापरून एक सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार केले आहे. ध्रुवने याला एक कायदेशीर चीट कोड म्हटले आहे. वास्तविक पाहता, ‘धुरंधर २’ च्या निर्मात्यांनी सांगितले होते की ही सत्य घटनांवरून प्रेरित एक काल्पनिक कथा आहे. नेमक्या याच गोष्टीला ध्रुव राठीसारख्या अनेक लोकांचा आक्षेप आहे.
आपल्या व्हिडिओमध्ये ध्रुव राठी म्हणाला, “जरा तार्किक विचार केला, तर प्रश्न पडतो की यात काही तर्क आहे का. एवढ्या लहानशा समस्येसाठी एवढं टोकाचं पाऊल (नोटबंदी) उचललं जाऊ शकतं का?” आपल्या व्हिडिओमध्ये ध्रुव राठी याने आरबीआयच्या अहवालातील आकडेवारीसुद्धा दाखवली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, नोटबंदीनंतर एटीएमच्या रांगेत उभे असताना अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेकांना हृदयविकाराचे झटके आले.
ध्रुव राठीने ‘धुरंधर २’ या चित्रपटासंदर्भात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला काही प्रश्न विचारले आहेत. असा चित्रपट का योग्य ठरवला जाऊ शकतो, असा प्रश्न त्याने विचारला आहे. या चित्रपटात एका राष्ट्रीय राजकीय पक्षाला देशद्रोही म्हणून चित्रित केले आहे. भविष्यात असे चित्रपट बनवले जाऊ शकतात, अशी चिंता त्याने व्यक्त केली आहे.