
दिग्पाल लांजेकरांचा 'अभंग तुकाराम' ७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित (Photo Credit - X)
Abhanga Tukaram: महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. संत तुकाराम महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. जीवनप्रवाहात कायम राहून त्यांनी घेतलेला परमेश्वरप्राप्तीचा ध्यास आणि यातून घडलेला त्यांचा आध्यात्मिक प्रवास चकित करणारा आहे.
लौकिकाडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. पॅनोरमा स्टुडिओज, चित्रकथी क्रिएशन्स निर्मित ‘अभंग तुकाराम’ ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. पॅनोरमा स्टुडिओचे कुमार मंगत पाठक चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यासोबत अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर यांनीही निर्मितीची धुरा सांभाळली असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.
दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित आहे. प्रेमरूप भक्तितत्त्वातून वास्तवाचे दर्शन घडविताना लोकजीवनातील भक्तीची गंगा अखंड वाहती ठेवून उभ्या केलेल्या जीवनवादी विवेकदर्शनाची झलक या ट्रेलरमधून दिसुन येते आहे. प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत आहेत तर त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे त्यासोबत मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, अभिजित श्वेतचन्द्र, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अवधूत गांधी, नुपूर दैठणकर,तेजस बर्वे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. अवधूत गांधी, बेला शेंडे, अजय पूरकर, जयदीप वैद्य, अजित विसपुते, चंद्रकांत माने, नूतन परब, अमिता घुगरी, मुक्ता जोशी, ईश्वरी बाविस्कर, ज्ञानेश्वर मेश्राम, केदार जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.
चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्हीएफएक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत. पॅनोरमा स्टुडिओज जगभरात (वर्ल्ड वाईड) या चित्रपटाचे वितरण करणार आहे.