
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी, इतिहासाशी आणि भावनांशी थेट नातं जोडणारा विषय या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रप्रेमी प्रेक्षकांकडून या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्था निर्मित या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या विविध घटनांचा आढावा घेत, त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान या नाटकातून जिवंत केला जातो. इतिहासातील त्या निर्णायक क्षणांना रंगमंचावर अनुभवताना प्रेक्षक भारावून जाणार आहेत.
नाटक पाहताना एकीकडे पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या कथा मनाला भिडतात. त्याचबरोबर आजच्या काळातील वास्तव परिस्थितीवरही हे नाटक भाष्य करते. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात मराठी माणसाचं स्थान नेमकं काय उरलं आहे, हा प्रश्न ठळकपणे मांडला जाणार आहे.
गावागावातून मुंबईत येऊन आपल्या कष्टाने ही नगरी उभी करणाऱ्या मराठी माणसाची ओळख आज बदलत चालल्याचं चित्र या नाटकातून उभं राहतं. “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम संदेश देत, आजच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर विचार करायला भाग पाडणारा हा प्रयोग आहे. गिरगाव, लालबाग, परळ, दादर यांसारख्या पारंपरिक मराठी वस्तींच्या भागात आज मराठी माणूस किती उरलाय, हा सवालही नाटक प्रभावीपणे उपस्थित करतं आहे.
दिग्दर्शकाने रंगमंचीय मांडणीमध्ये नाट्य, दृश्य आणि तंत्रज्ञानाचा सुंदर संगम साधला आहे. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून सादर केलेले दृश्य नाटकाला एक वेगळाच आयाम देतात. या आधुनिक सादरीकरणामुळे प्रेक्षकांना नाट्यचित्र माध्यमाचा एक नवीन आणि समृद्ध अनुभव मिळतो. आदेश बांदेकर आणि उदय सबनीस यांच्या निवेदनामुळे नाटकाला अधिक वजन प्राप्त झालं आहे.
BO Collection: Dhurandhar 2 ने अवघ्या पाच दिवसात गाठला ५०० कोटींचा टप्पा; जाणून घ्या एकूण कलेक्शन
या नाटकाला रोहन पाटील यांचं संगीत, राजेश शिंदे यांची प्रकाशयोजना आणि प्रसाद सोनावणे आणि हर्ष राऊत यांनी साकारलेल्या AI चित्रफितींचा प्रभावी आधार लाभला आहे. शाहीर मनोहर गोलांबरे आणि रविंद्र खोमणे यांच्या गायनाने वातावरण अधिक जिवंत होतं. गणेश जाधव आणि संदिप जंगम यांच्या अभिनयामुळे नाटक अधिक प्रभावी बनतं.
या नाट्यकृतीची निर्मिती महेश भोसले आणि संदिप जंगम यांनी केली असून, व्यावसायिक रंगभूमीवर आशयघन आणि विचारप्रवर्तक विषय हाताळण्याचा हा एक कौतुकास्पद प्रयत्न आहे. मराठी इतिहास, संस्कृती आणि अस्मिता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्व लक्षात घेता, प्रेक्षकांनी या नाटकाचा आवर्जून आस्वाद घ्यावा आणि पुढील पिढीलाही हे नाटक दाखवावं, असं आवाहन करण्यात येत आहे.