
Aditya Thackeray Social Media Post on Pune City Flooding Due to Unseasonal Rains
पुण्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून सामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. यावरुन माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी महायुती सरकारवर आणि पुण्यामध्ये अतिक्रमण करुन केलेल्या विकासकामांवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी लिहिले आहे की. “पुण्यात काल झालेला पाऊस ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा ४ तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता; मात्र ह्या पावसाने प्रशासनाचे अपयश अधोरेखित केले,” अशी टीका त्यांनी केली.
हे देखील वाचा : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब
आदित्य ठाकरेंनी पुढे लिहिले आहे की, “पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. त्यामागचे मूळ कारण म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आणि सत्ताधाऱ्यांनी पर्यावरणीय धोक्याच्या चिन्हांकडे केलेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष! मागील ४ वर्षांपासून पर्यावरण तज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरीक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. अशा अव्यवहार्य प्रकल्पांमध्ये, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीच्या रेड आणि ब्लू फ्लड लाईन्समध्ये केलेले बदल आणि वेताळ टेकडीच्या नाशाचा प्रस्ताव हे सर्व मुद्दे वारंवार मांडण्यात आले आहेत,” अशी सर्व कारणे आदित्य ठाकरेंनी सांगितली.
पुण्यात काल झालेला पाऊस ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा ४ तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता; मात्र ह्या पावसाने प्रशासनाचे अपयश अधोरेखित केले. पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. त्यामागचे मूळ कारण म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून… — Aaditya Thackeray (@AUThackeray) April 3, 2026
हे देखील वाचा : उन्हाळा की पावसाळा? Pune शहरात हवामानाचा लपंडाव; पुढील दोन दिवसांत….
‘विकास’ नावाखाली केवळ मृगजळ दाखवले
तसेच, “मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, फक्त काँक्रीट ओतणे म्हणजे विकास नाही. गेल्या दशकभरापासून पुण्यात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असूनही, हा कथित विकास प्रत्यक्षात संकटच ठरत आहे. जर हा तथाकथित विकास असाच सुरू राहिला, तर पुण्याला अशा परिस्थितींना अनेकदा सामोरे जावे लागेल आणि ‘विकास’ नावाखाली केवळ मृगजळ दाखवले जाईल. २०२१ मध्ये पर्यावरण मंत्री म्हणून, मी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवून तो पुण्याच्या गरजेनुसार पुन्हा आखण्याचे निर्देश दिले होते. नदीच्या नैसर्गिक व मूळ रेड- ब्लू फ्लड लाईन्स पुन्हा निश्चित करणे अत्यावश्यक आहे, सलीम अली पक्षी उद्यान पुनर्जीवित केले होते, जे आज पुन्हा ढिगाऱ्यांनी भरले जात आहे. वेताळ टेकडी आणि इतर मोकळ्या जागांचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे याबाबात निर्णय आता आपल्या हातात आहे आणि त्याच्या परिणामाची झलक काल पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे!” असे स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे. पुणे शहराच्या झालेल्या या अवस्थेवरुन त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरले.