‘मनोज जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’; अजय बारस्करांचा थेट सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे. गेल्या 18 दिवसांपासून उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तरीही जरांगे मुंबईकडे निघाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय बारस्कर यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर थेट सवाल उपस्थित केला आहे. ‘मनोज जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’ असा प्रश्न त्यांनी केला. हे उपोषण खरंच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आहे की चौघांना दाखले मिळवून देण्यासाठी आणि काही चौकशा थांबवण्यासाठी, याचं उत्तर जरांगे यांनी द्यावं, असं बारस्कर यांनी म्हटलं आहे.
बारस्कर यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. जरांगे यांचं उपोषण मराठा समाजासाठी असेल, तर त्यांच्या स्वतःच्या सहीचं मागण्यांचं सविस्तर निवेदन कुठे आहे? त्या निवेदनात नेमक्या कोणत्या मागण्या आहेत, त्या सरकारकडे कधी देण्यात आल्या आणि आतापर्यंत सरकारने त्यापैकी किती मागण्या मान्य केल्या, याची माहिती समाजासमोर का ठेवली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.
तसंच, जरांगे यांच्या आसपास असलेल्या काही व्यक्तींवर विविध यंत्रणांच्या नोटिसा आणि चौकशी सुरू असल्याचा दावा बारस्कर यांनी केला. या चौकशा थांबवण्यासाठी जरांगेंवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, हे आरोप बारस्करांचे दावे आहेत.
जरांगे यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्यासाठी कोण जबाबदार असेल, असा सवालही बारस्कर यांनी उपस्थित केला. केवळ चार व्यक्तींच्या प्रमाणपत्रांसाठी किंवा चौकशा थांबवण्यासाठी जरांगेंवर उपोषणाचा दबाव आणला जात असेल, तर संबंधितांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे बारस्करांच्या या आरोपांवर जरांगे पाटील काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Rohit Pawar News: आदित्य ठाकरेंना क्लीनचीटच मिळेल; सीबीआयच्या FRIनंतर रोहित पवारांचा घणाघात!






