Congress state president Harshvardhan Sapkal's reaction on Maratha reservation GR
नागपूर : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येत आंदोलन केले. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी पाच दिवसांचे उपोषण केले. यानंतर जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विजय झाला असल्याचे म्हणत गुलाल उधळला आहे. यावर आता कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी नागपूरमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी आरक्षणाबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “मुळात हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा राजकीय कमी किंवा हा सोशल इकॉनॉमिकल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. वेगळा देश जो निर्माण झाला त्या अनुषंगाने शोधण्याची आवश्यकता आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा परंपरा लाभली आहे, मात्र गेल्या काही काळात मोदी सरकार आल्यावर जे धोरण देशात राबवली जात आहेत या परिस्थितीने शासन केला आहे त्यामुळे उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झाली आहे,” असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचलला त्यांनी तळागाळातील मराठा समाजातील अपेक्षा अधोरेखित करीत असताना या मोहिमेचा नेतृत्व केलं. मागच्यावेळी नवी मुंबईच्या वेशीवरून गुलाल उधळून आंदोलकांना वापस पाठवलं आणि आरक्षण मिळालं अशी आवई ठोकल्या गेली आणि मराठा समाजाचे फसवणूक झाली,” असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.
या आंदोलनातून स्पष्टता अजून बाकी
“निवडणुका लागल्या त्यावेळी सात दिवसाच्या आत आरक्षण देऊन असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप आधीच सुटायला हवा होता, मात्र देवेंद्र फडणवीस यांना समाजामध्ये भांडण लावायची सवय आहे त्यामुळे उशीर झाला. ओबीसींना देखील त्यांचे अधिकार अबाधित ठेवायचे आहेत आणि मराठा समाजाचे अधिकार आरक्षण देता आला पाहिजे. या आंदोलनातून स्पष्टता अजून बाकी आहे,” अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे झालं ते मराठा आंदोलनाचे होऊ नये, अशी अपेक्षा आहे. मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता कालच्या निर्णयाच्या माध्यमातून असू शकते त्यामुळे स्पष्टता आणणे फार आवश्यक आहे. या एकूण सर्व शासन निर्णयाच्या जी चर्चा ऐकतो त्याचा योग्य स्वरूपात निघू द्या आमची जी भूमिका आहे ती मराठ्यांना आरक्षण देण्याची आहे मात्र ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे या आरक्षणातही वाढ झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे,” असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.