
'गुंगी गुडिया' वरून राजकारण पेटले, काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा वाद
राज्यातील राजकीय वातावरणात आता आणखी एक ठिणगी पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोरादार वाद रंगू लागला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर सोशल मीडियावर बोचरी टीका केल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस पक्ष वादात सापडला असून यावरून राष्ट्रवादीने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.
सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून सुनेत्रा पवारांवर टीका करताना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले. त्यामुळे हा वाद उफाळून आला असून यावरून काँग्रेसवर चोहोबाजूंनी टीकेचा भडीमार होताना दिसत आहे.
Sanjay Raut On PM Modi: नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात
वादाची सुरुवात काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरील एका पोस्टमुळे झाली. काही दिवसांपूर्वी बीड दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत पत्रकार परिषद संपवली. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना “गुंगी गुडिया” असे संबोधले आणि त्या स्वतंत्र भूमिका कधी मांडणार, असा सवाल उपस्थित केला.
सुनेत्रा पवार, अजून किती दिवस “गुंगी गुडिया” बनून राहतील ! pic.twitter.com/1Cgj9dZfBq — Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 3, 2026
या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली. पक्षाचे प्रवक्ते उमेश पवार यांनी काँग्रेसवर टीका करत “गुंगी गुडिया” हा शब्दप्रयोग नवीन नसल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विरोधकांनी त्यांच्यासाठीही हा शब्दप्रयोग वापरला होता. मात्र, इंदिरा गांधी यांनी आपल्या कामगिरीतून त्या टीकेला उत्तर दिले होते.
उमेश पवार यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळी महिलेचा अवमान मानले होते, त्याच शब्दांचा वापर आज काँग्रेस स्वतः एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध का करत आहे? यामुळे काँग्रेसची भूमिका विरोधाभासी असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोठी बातमी ! काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा; पक्षावर केला विश्वासघाताचा आरोप
तसेच, इंदिरा गांधींवरील त्या काळातील टीका योग्य होती, असे काँग्रेस आता अप्रत्यक्षपणे मान्य करत आहे का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. हा विषय केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून सार्वजनिक जीवनातील महिलांविषयीच्या राजकीय संवादाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक जीवनात महिलांचा सन्मान राखत राजकीय टीका व्हावी आणि संबंधित शब्दप्रयोग काँग्रेसने मागे घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेसने केलेल्या टीकेमुळे आणि त्यानंतर राष्ट्रवादीने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आगामी काळात या वादावर दोन्ही पक्षांकडून आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, महिला नेत्यांविषयी राजकीय भाष्य करताना वापरल्या जाणाऱ्या शब्दांवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.