
Congress on Baramati By Election : ” उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामतीकरांच्या भावनांचा आदर करत बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस अखेर माघार घेत आहे,” अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीत उमेदवार दिला होता. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस उमेदवार आज माघार घेणार की नाही, अशी उत्सुकता लागली होती. अखेर हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवढणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, “बारामतीची पोटनिवडणूक ही काँग्रेसने लढवलीच पाहिजे. काँग्रेसने बारामतीला वैचारिक लढाई दिली. महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता पाळायला हवी. रमेश चेन्निथला यांच्याशी चर्चा झाली. सुनेत्रा वहिनींनी आज मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही एका निर्णयापर्यंत पोहचलो आहोत. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या विनंतीनंतर त्यांच्याविरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”
बारामती आणि राहुरी याठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार असल्याची भूमिका आम्ही घेतली आणि त्यासाठी अर्ज दाखल केला. आकाश मोरे यांनी बारामतीसाठी अर्ज भरला. बारामतीसाठी आम्ही ६ तारखेला अर्ज भरला. या निवडणुकीसाठी आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचारही करू लागले होते. पण अजितदादांचा अपघात हा मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या मृत्यूपश्चात निवडणूक होत असल्याने यासंदर्भात काँग्रेसने या भावनिक भूमिकेला साथ दिली. अजित पवार दिर्घकाळ काँग्रेससोबत सत्तेत होते. काँग्रेससोबत विरोधी पक्षांतही होते. ते सुरुवातीच्या काही निवडणुका काँग्रेसचे पक्षचिन्ह पंजावरच निवडणूक लढले. या सर्व गोष्टीची आठवण करून देत काँग्रेसने ही निवडणूक लढवू नये, असा प्रस्ताव अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीकडून करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीदेखील आम्हाला फोन केला होता. पण त्यावेळी पक्षाचा निर्णय झाला होता. कालही अजित पवार आणि काँग्रेसमधील पुर्वीचे नाते पाहता निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती आम्हाला करण्यात आली होती.
आजही त्यांनी पुन्हा संपर्क साधला, त्यासोबतच राष्ट्रवादीचे एक शिष्टमंडळाने आमच्या नेत्यांची भेट घेतली, त्यांचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या निवडणुकीत काँग्रेसने थांबवण्याची विनंती केली. तसेच, धनंजय मुंडे यांनीदेखील फोन केला होता. आज सकाळ पासून आमदार रोहित पवार यांनीदेखील पहाटेच आमच्या नेत्यांशी संपर्क साधत काँग्रेसने सहकार्याची भूमिका घेण्याची भावना व्यक्त केली. बारामती करांनाही आम्ही श्रद्धांजली म्हणून मते मागत आहोत. अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या अपघातासंबंधी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचे समर्थनही केले. पण काही हास्यास्पद वक्तव्य, अपरिपक्व वक्तव्यंही आमच्या विरोधात करण्यात आली. पण रोहित पवारांनी त्याबाबतही दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार यांनीदेखील आम्हाला सल्ला दिली. या सगळ्या विषयांवर आमची वरिष्ठ नेत्याशी चर्चा झाली. ही निवडणूक लढलीच पाहिजे, अशी आमची भूमिका होती. पण अजितदादांचा काँग्रेस पक्षासह दीर्घकाळ असलेल्य स्नेह होता. ही बाबही आम्ही लक्षात घेऊन आम्ही बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं आहे.