Baramati Politics: 'आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!' पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
Baramati by-election: जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. पण त्याचवेळी काँग्रेसनेही या जागेसाठी आपला उमेदवार दिला आहे. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते काँग्रेसशी संपर्क साधत आहेत, त्यामुळे काँग्रेस अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढत चालली आहे. या सगळ्या घटनाक्रमावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेसबद्दल केलेल्या काही विधानांवरून मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. “काही चूक-भूल झाली असेल तर माफ करा,” अशा शब्दांत रोहित पवारांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असावी, यावर या बैठकीत खलबते झाल्याचे समजते.
या निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील विसंवादही समोर आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर केवळ चार दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निर्णयाची पुसटशी कल्पनाही शरद पवार यांना देण्यात आली नव्हती.सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरताना पार्थ पवार यांच्या संदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आत्या म्हणून जे काही सांगायचे असते, ते मी घरात सांगेन, कॅमेऱ्यासमोर नाही.”
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर निवडणूक झाली तर सुप्रिया सुळे आपल्या वहिनी (सुनेत्रा पवार) यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का? यावर सुळे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,”अजून काही ठरले नाही. निवडणुकीबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो काँग्रेसचा असेल.” सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी हर्षवर्धन सपकाळ यांना केलेल्या फोनबाबतही आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
जरी महायुती आणि सुनेत्रा पवार ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्या, तरी सुप्रिया सुळे यांनी चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे. रोहित पवारांच्या दिलगिरीनंतर काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार की ‘फ्रेंडली फाईट’ होणार, हे आता काही तासांतच स्पष्ट होईल.






