
'भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी,' धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अखेर तब्बल 35 दिवसांच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलकांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावरून आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अश्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाउंटवरून पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी संपूर्ण भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले.
फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “श्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पीएम श्री शाळांची स्थापना, परदेशात आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक सुधारणा राबवल्या.”
देश की शिक्षा क्षेत्र में कई महत्वपूर्ण सुधार करने का काम श्री धर्मेंद्र प्रधान जी इन्होंने किया. राष्ट्रीय शिक्षा नीति लागू करने में उनकी अहम भूमिका रही. पीएम श्री स्कूल, आईआईटी का विदेशों में विस्तार, प्रवेश परीक्षाओं का 19 भाषाओं तक विस्तार ऐसे कई सुधार उन्होंने किए.
व्यापक… https://t.co/W2BGjOcIn4 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 25, 2026
“व्यापक समाजकल्याणाप्रति आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, हेच एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे लक्षण आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे.”
संयुक्त पत्रकार परिषदेत CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे सर्व आंदोलनकर्त्यांनी तात्काळ शांततेच्या मार्गाने आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी परतावे, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यातील रणनीतीबाबत आणि इतर मुद्द्यांबाबत योग्य वेळी माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही आंदोलनकर्त्यांना घरी परतण्याचे आवाहन केले. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आणि ठरलेल्या कालमर्यादेत अटींची अंमलबजावणी होईल, या अपेक्षेने आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी NEET परीक्षेशी संबंधित आत्महत्यांमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना नियमांनुसार आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती दिली. CJP ने या कुटुंबांना १ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यावर सरकारने कायदेशीर तरतुदींनुसार सन्मानजनक आर्थिक भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याचे आशुतोष रांका यांनी सांगितले.