'रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका'; 'सावजी'वरून बावनकुळे आक्रमक
Manoj Jarange Patil : राज्यात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून उपोषणावर असलेले जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने आता जरांगे मुंबईकडे कूच करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांना आंदोलनाबाबत कळकळीची विनंती केली आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वात राज्यात आंदोलन करण्याची ही वेळ नाही, असं बावनकुळे म्हणाले.
“गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सर्वच पक्ष आणि व्यक्तींना विनंती करतो की, राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत,” अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली. गणपती बाप्पा महाराष्ट्राला विकासाची दिशा आणि एकजुटीची बुद्धी देण्यासाठी आले आहेत. हे दहा दिवस महाराष्ट्राला मजबुती देणारे असून या काळात समाजात कोणतंही गालबोट लागू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत. ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून आझाद मैदानावर उपोषण करण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असताना जरांगे आपला निर्णय बदलणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, बावनकुळे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही महत्त्वाची माहिती दिली. 18 जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची आकडेवारी सरकारकडे आली असून हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महसूल विभागाशी संबंधित 107 कॅबिनेट निर्णय घेण्यात आल्याचं सांगताना बावनकुळे यांनी राज्यात लवकरच ‘लँड टायटलिंग ऍक्ट’ आणला जाणार असल्याची माहिती दिली. मोजणी केल्याशिवाय मालमत्तेची रजिस्ट्री होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे हक्क सुरक्षित राहावेत, यासाठी महसूल विभाग काम करत असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री बळीराजा रस्ते योजनेवरही काम करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आता एका बाजूला जरांगेंचं मुंबई आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका, यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.






