
आमचे खासदार फुटणार नाही; अनिल देशमुखांनी केलं मोठं विधान
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ अस्तित्वात नाही. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीदेखील चुकीचे वृत्त असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे गट असो की आमचे खासदार, कुणीही फुटणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
शिंदे गटाचे किती खासदार आहेत, याची सर्वांना कल्पना आहे. कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे, ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक पक्षाचे खासदार हे त्यांच्या पक्षाशी प्रामाणिकपणे सोबत आहेत. खासदार फुटतील असे घडणार नाही, अशा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच शेतकरी आज अतिशय अडचणीत असून, पेरणीच्यावेळी संकट आणखी वाढेल. सोयाबीनचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांनी कापूस विकल्याने आता झालेल्या भाववाढीचा फायदा व्यापा रयांना होणार आहे.
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
दरम्यान, कर्जमाफीच्या आश्वासनांचे काय होते, हे आम्ही पाहणार आहोत. दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होणार नाही. यानिमित्त सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली.
खासदार भेटीवर देशमुख म्हणाले…
एखाद्या मंत्र्याकडे विरोधी पक्षातील खासदार, आमदार जात असेल, तर याचा अर्थ तो खासदार चांगला नाही, असा होत नाही. अनेक लोक आपल्या मतदारसंघातील महत्त्वाचे काम, जनतेची कामे घेऊन मंत्र्यांकडे जात असतात. त्यासाठी खासदारांची भेट झाली असावी, असेही देशमुख म्हणाले.
पवारांमुळे माघार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विजयी व्हाव्या, असे सर्वांना वाटते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत शरद पवार यांची चर्चा झाल्यानंतर काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतला. भाजपचे म्हणणे काँग्रेस ऐकत नाही. खर्गे-पवार चर्चेनंतर दिल्लीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी निर्णय घडवून आणला, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.