(Photo - X)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अलीकडील वक्तव्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत अनेक प्रश्न उपस्थित केले.
सदावर्ते यांनी आरोप केला की, “मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी सातत्याने अवमानकारक भाषा वापरत आहेत. अशा प्रकारची भाषा स्वीकारार्ह आहे का,” असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून केला. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख अपमानास्पद पद्धतीने केला जात असताना त्यावर संबंधित नेते मौन का बाळगतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, “मनोज जरांगे सातत्याने फडणवीस, बावनकुळे यांच्याविषयी अवमानकारक बोलत आहेत. हि गोष्ट एकनाथ शिंदेंना मेनी आहे का ? ठाणे कि रिक्षा हे गाणं ऐकल्यावर शिंदेंना आग लागते मग मनोज जरांगे चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनकुळ्या’ असा करतो, यावर एकनाथ शिंदे काहीच कसे बोलत नाहीत?”
पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते म्हणाले की, “भारतीय संविधान लागू झाल्यानंतर सर्व नागरिक समान आहेत आणि कोणालाही इतरांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. कोणत्याही समाजाच्या किंवा नेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशा प्रकारच्या वक्तव्यांना विरोध केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारची भाषा वापरल्यास कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, ” या देशात संविधान अंमलात आल्यापासून कोणीही पाटील किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी शिलाक उरलेले नाही. त्यामुळे मनोज जरांगे इतर समाजाच्या नेत्यांबाबत अपमान करणारी, नीच भाषा वापरतात. तश्याप्रकारे आम्ही भटक्या, विमुक्त, ओबीसी, मागासवर्गीय, भिक्षुकी करणारे ब्राम्हण कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही. जरांगेंनी तसं केलं तर कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असे ते म्हणाले.
यावेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोपही केले. जरांगे पाटलांचा संबंध रेती उपश्यांशी असल्याचे आरोप त्यांनी केले. तसेच, उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणाचाही उल्लेख करत सदावर्ते यांनी त्या संवादातील भाषेवर आक्षेप नोंदवला. त्यांच्या मते, सार्वजनिक संवादामध्ये संयम आणि सभ्य भाषेचा वापर होणे आवश्यक आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.






