विजय वडेट्टीवार अन् मनोज जरांगे पाटील (फोटो- सोशल मिडिया)
देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त करून बँका बुडतील अशी स्थिती पंतप्रधान मोदी यांनी निर्माण करून ठेवली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. UPI द्वारे होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या व्यवहारावर बँका १२ रुपये वसूल करणार असून, व्यापाऱ्यांवर पडणारा हा भार अंतिमतः सामान्य ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जाईल.एक लाखाच्या व्यवहारावर सरकार थेट ६०० रुपये वसूल करणार आहे. ही सामान्य जनतेची उघड फसवणूक असून, गरिबांचे पैसे लुटून उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करण्याचे काम हे सरकार करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकार जरांगे यांना वारंवार का फसवते आणि जरांगे स्वतः का फसतात, याची समीक्षा करण्याची गरज आहे. जरांगे पाटलांच्या मागण्या वारंवार बदलत गेल्या. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध नाही. मात्र हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात. गाड्यांचा ताफा घेऊन ज्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन केले जात आहे, त्यावरून आपण लोकशाहीत आहोत की राजेशाहीत असा प्रश्न पडतो. सध्या भावनिक साद घालून भावना भडकावून जे चाललाय, त्या आंदोलनाशी ओबीसींचा काही संबंध नाही.
राज्यात सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातचे गेले असून धानाचे पीकही करपू लागले आहे. या भीषण परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विरोधी पक्षनेता असताना फडणवीस पंचनाम्याची वाट न पाहता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करायचे.
मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा बदलली असून आता ते सर्व्हेक्षण आणि पडताळणीच्या गप्पा मारत आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, या संकटाच्या काळात केवळ काही नेत्यांनीच नव्हे तर संपूर्ण विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रभर दौरे काढून प्रत्येक जिल्ह्यात सरकारविरोधात तीव्र आंदोलने छेडली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.






