
'महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला ,' वाढत्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
राज्यात सततच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. अश्यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून आता यावरून राजकीय नेत्यांनीही राज्य सरकार आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून फडणवीसांवर ताशेरे ओढत “महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला!” अश्या शब्दांत त्यांनी सुनावले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडेतोड टीका केली. ते म्हणाले, “मुंबईच्या लोकलमध्ये एका मराठी तरुणाची निर्घृण हत्या होते… महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत… खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे…
पुण्यात विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी जातो… एका जिवंत महिलेला मृत घोषित करून तिच्या वडील आणि भावाला अटक करून मारहाण केली जाते… सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते…”
ते पुढे म्हणाले, “मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपासून ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. भरदिवसा हत्या होतात, टोळ्या खुलेआम दहशत माजवतात, ड्रग्ज माफिया राज्यभर जाळं पसरवतात आणि सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाला प्रगतीचा मार्ग दाखवला, त्या महाराष्ट्रात आज नागरिक स्वतःच्या सुरक्षेबाबत साशंक आहेत. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची घसरण नाही, तर राज्यकर्त्यांचे अपयश आहे.”
महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला! मुंबईच्या लोकलमध्ये एका मराठी तरुणाची निर्घृण हत्या होते… महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत… खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे…
पुण्यात विषारी… pic.twitter.com/OP7YBAiV1j — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 25, 2026
“सत्तेसाठी आमदार फोडा, खासदार फोडा, पक्ष फोडा, विरोधकांना संपवा… पण राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मात्र सरकारकडे ना इच्छाशक्ती आहे, ना धोरण, ना जबाबदारीची जाणीव! देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची ओळख ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे राज्य म्हणून निर्माण होत आहे. “महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला” हे आता वास्तव बनत आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला