
हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
पणजी : देशातील संविधान आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीवर जोरदार टीका करत, ‘फॅसिस्ट विचार देशासाठी आणि जगासाठी घातक आहेत. या विचारांपासून देशाला वाचवण्याची गरज आहे,’ असं म्हटलं आहे.
पणजी येथे ऑल इंडिया कौमी तंजीमच्या वतीने आयोजित संविधान बचाव कार्यक्रमात सपकाळ बोलत होते. देशात दोन वेगवेगळे विचारप्रवाह असल्याचं सांगत त्यांनी एका विचारप्रवाहाला सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारा संविधानाचा विचार, तर दुसऱ्या विचाराला मनुस्मृतीला मानणारा विचार म्हणून संबोधलं.
भाजपा आणि आरएसएसकडून संविधान संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. ‘संविधान वाचले तर देश वाचेल, त्यामुळे संविधान वाचवण्याच्या लढ्यात सहभागी व्हा,’ असं आवाहन त्यांनी केलं.
Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा
सपकाळ यांनी आरएसएसच्या विचारसरणीवरही टीका केली. संविधानाला अभिप्रेत असलेला देश भाजपा आणि आरएसएसला नको असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची नोंदणी करून संविधान स्वीकारावं, असं आवाहन त्यांनी केलं.
गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी संविधान आणि काँग्रेसचा विचार एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं सांगितलं. संविधानाने सर्व जाती-धर्मांना समान अधिकार दिले आहेत आणि त्याचं रक्षण करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली असल्याचं ते म्हणाले. संविधान कोणत्याही परिस्थितीत बदलू दिलं जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राहुल गांधी यांच्या संविधान बचाव अभियानाचा उल्लेख करत भाजपा आणि आरएसएसवर टीका केली. संविधान निर्मितीपासूनच आरएसएसने त्याला विरोध केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आरएसएसने तिरंगा ध्वजालाही विरोध केल्याचं चोडणकर म्हणाले.
या कार्यक्रमाला गोवा काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार तसेच काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पणजीतील या कार्यक्रमातून काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांविरोधात आपली भूमिका आणखी आक्रमकपणे मांडल्याचं पाहायला मिळालं.