
Kavita Mule becomes Mayor of Nanded promise devlopment of nanded
Nanded News : नांदेड: कर्ज विरहित मनपा करण्याचा संकल्प केला असून आगामी काळात स्वच्छ सुंदर सुरक्षित नांदेड करण्याचा मानस आहे, आमचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी १०० दिवसांच्या कार्यक्रम तयार करून त्यानुसार काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत, लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचीत महापौर कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली महापौरपदी निवड झाल्यानंतर मुळे यांन पत्रकारांशी संवाद साधला. (Nanded News)
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, विकसित नांदेड करणार असल्याचे आमच्या संकल्पनाम्यात सांगण्यात आले आहे. त्या अनुषंगाने खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. शाळांमधून दर्जेदार शिक्षण देणे, शहर वाहतूकीची समस्या सोडविणे, शहरातील नागरिकांसाठी शहरबससेवा सुरू करणे तसेच महिला व मुलींच्या सुरक्षितेसाठी ठोस उपाययोजना करणे आदी कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. स्वच्छ सुंदर सुरक्षित शहरासाठी मनपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
इंदौरच्या धर्तीवर नांदेडमध्ये स्वच्छतेचा प्रयोग
गोदावरी शुद्धीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे त्यावेळी म्हणाल्या, मी शिक्षिका असल्यामुळे मनपाच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असून मुलाना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे, सर्व शाळांना भेट देणार असल्याचे यावेळी मुळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना उपमहापौर दिपकसिंह रावत म्हणाले की, इंदौरच्या धर्तीवर नांदेड शहरात स्वच्छतेचा उपक्रम राबविणार असून स्वच्छ सुंदर शहर व्हावे, तसेच शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्य देणार आहोत
हे देखील वाचा : ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान
एमआयएमने राष्ट्रगीताचा अवमान केला असून त्यामुळे भारतमातेचा, संविधानाचा अवमान झाला आहे. पुढील काळात एमआयएमला जशास तसे उत्तर देवू असा इशाराही रावत यांनी यावेळी दिला. महापौर, उपमहापौर हे सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून काम करतील, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेवू तसेच सभागृहाचे कामकाज अतिशय शिस्तीत चालविण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी सभागृह नेते तथा भाजप शिवसेना युतीचे गटनेते अॅड. महेश कनकदंडे यांनी सांगितले.
गतीमान, पारदर्शक कारभाराची अपेक्षा
नांदेड शहर हे कै. शंकरराव चव्हाण व खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे विकासाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा संबंध चव्हाण घराण्याशी जोडला जातो. त्यामुळे नव्या महापौर-उपमहापौरांनी ही जबाबदारी परंपरा ओळखली पाहिजे. जपण्याची निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी अशोकराव चव्हाण यांच्याकडे समस्यांचा जो भडीमार केला, त्यावरून शहरातील वास्तव किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. विसर्जित मनपात टेंडर प्रक्रियेत झालेला गोंधळ, खचांचे फुगविलेले आकडे, ठेकेदारधार्जिणे निर्णय, यामुळे महापालिका आर्थिक गर्तेत सापडली. या प्रवृत्तींपासून नव्या नेतृत्वाने दूर राहणे आवश्यक आहे.
काही वादग्रस्त चेहरे पुन्हा मनपात सक्रिय झाले असून त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले…
महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ केवळ एका वर्षांचा राहणार असल्याची चर्चा आहे. या अल्प काळात ठोस धोरणे, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख निर्णय घेऊन विश्वास संपादन करावा लागेल. नागरिकांची नाळ थेट महापालिकेशी जोडलेली असल्याने छोट्या-छोट्या तक्रारी जागेवरच निकाली काढण्याची यंत्रणा उभी करणे महत्त्वाचे ठरेल. दैनिक नवराष्ट्र नूतन नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहे. चांगल्या कामांचे आम्ही निःसंकोच कौतुक करू; मात्र चुकीच्या निर्णयांवर प्रहारही करू, नांदेडकरांना दिलासा देणारा, स्वच्छ व गतिमान कारभार घडेल, हीच अपेक्षा.