
‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक आंदोलन करत आहेत. येत्या २० जुलैला अभिजीत दिपकेंच्या नेतृत्त्वात संसदेवर मोर्चा काढला जाणार आहे. दिपकेंच्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे पक्षाचा पाठिंबा आहे. अशी घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी त्यांनी ‘क्रोकरोच जनता पार्टी’मध्ये उबाठा गट विलीन होण्याची मानसिक तयारी तर सुरू नाही ना? असा खोचक सवाल उपस्थित केला.
आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून उपाध्ये म्हणाले, “क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद पूर्णपणे पाहिली आणि ऐकली. ती पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडला, अचानक स्थापन झालेल्या कथित ‘क्रोकरोच जनता पार्टी’मध्ये उबाठा गट विलीन होण्याची मानसिक तयारी तर सुरू नाही ना?”
“नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र नेहमीप्रमाणे ठोस भूमिका किंवा स्पष्ट दिशा न देता हवेत गोळीबार, ढोंगी हिंदुत्वाचा आव, इतरांना उपदेश आणि संभ्रम निर्माण करणारी विधाने एवढाच तिचा गाभा होता. आंदोलनाला पाठिंबा देतानाच देशातील तरुणांनाही त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.”
‘क्रोकरोच पार्टी’त विलीन
होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद पूर्णपणे पाहिली आणि ऐकली. ती पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडला, अचानक स्थापन झालेल्या कथित ‘क्रोकरोच जनता पार्टी’मध्ये उबाठा गट विलीन होण्याची मानसिक तयारी तर सुरू नाही ना? नवी दिल्लीतील… pic.twitter.com/ldZuKj4UNz — Keshav Upadhye (@keshavupadhye) July 13, 2026
उपाध्ये यांनी पुढे टीका करत म्हटले की, “या कथित ‘क्रोकरोच जनता पार्टी’च्या सदस्यत्वासाठी जर काही निकष असतील, तर ते पूर्ण करण्यात उबाठा गटाला कोणतीच अडचण येणार नाही. पहिली अट म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात सातत्याने अवमानकारक भाषा वापरणे. हे तर उबाठा गटाचे रोजचे कामच झाले आहे. दुसरी अट म्हणजे दिशाहीन बडबड आणि केवळ आव्हानांची भाषा “हिम्मत असेल तर…” अशा प्रकारची वक्तव्ये. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी वास्तवाच्या कसोटीवर अपयशी ठरूनही ही शैली मात्र कायम आहे.”
“श्रीमंत उद्धवपंतांची पत्रकार परिषद म्हणजे मोदीजींनी काय करावे, हिंदूंनी काय करावे, महिलांनी काय करावे, तरुणांनी काय करावे, शेतकऱ्यांनी काय करावे याचा सल्लागार वर्गच असतो. स्वतःच्या जबाबदारीबाबत मात्र मौन आणि इतरांनीच सर्व काही करावे, असा त्यातून संदेश दिला जातो.”
केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर आणखी टीका करत म्हटले की, “यावेळी त्यात आणखी एक भर पडली. राहुल गांधी यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी “मोलाची सूचना”ही त्यांनी केली. म्हणजे इतरांनी रस्त्यावर उतरावे, पण आपण मात्र ‘मातोश्री’च्या बाहेर पडणार नाही, एवढेच त्यांना बहुधा सांगायचे असावे.”