
'संजय राऊत शिवीगाळ करत असतील तर...' राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावरून किरेन रिजिजूंची मोठी प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दुसऱ्यांदा पक्षफुटी झाली असून शिवसेना शिंदेगटाच्या ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अश्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून संताप व्यक्त करत फुटीर खासदारांवर शिवीगाळ करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून त्यांना आता इतर राजकीय नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अश्यातच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यास आधी नकार दिला. राऊत सातत्याने पक्षातील बंडखोरीवर टीका करत असताना त्यावर भाष्य करण्यास रिजिजू यांनी सुरुवातीला टाळले. “संजय राऊत एखाद्यावर टीका करत असतील किंवा शिवीगाळ करत असतील, तर त्याला उत्तर देणं योग्य ठरणार नाही,” असे ते यावेळी म्हणाले.
Operation Tiger : उज्ज्वल निकम यांचे मोठे भाष्य; ठाकरे गटातील 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?
माध्यमांशी संवाद साधताना किरेन रिजिजू म्हणाले की, “संसदेत काय घडतं हे सर्वांसमोर आहे आणि त्याबाबत वेगळं काही सांगण्याची गरज नाही. प्रत्येक खासदार आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी आणि स्वतःच्या पद्धतीने काम करत असतो. प्रत्येक राजकीय पक्षाची कार्यपद्धती वेगळी असते. त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्या खासदाराने काय करावं किंवा करू नये, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “संसदेत मांडल्या जाणाऱ्या विधेयकांवर सर्व पक्षांच्या खासदारांचे सहकार्य अपेक्षित असते. मात्र संजय राऊत एखाद्यावर टीका करत असतील किंवा शिवीगाळ करत असतील, तर त्याला उत्तर देणं योग्य ठरणार नाही.”
शिवसेना (UBT) मधील राजकीय घडामोडी आणि त्यावर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर किरेन रिजिजू यांनी घेतलेली सावध भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
संजय राऊत यांनी काल (बुधवार, 17 जुन) खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे यांनी पत्रकार परिषद घेत फुटीर खासदारांवर भाष्य केले. यावेळी संजय राऊतांनी या खासदारानावर वादग्रस्त विधाने करत शिवीगाळदेखील केली. आजदेखील पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. फुटीर खासदारांवर टीका करत ते म्हणाले, “लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं. एकनाथ शिंदेच्या विरोधात केलं, लोकांनी मशाल चिन्हाला मतदान केलं. हे सर्व लोक एकनाथ शिंदेंच्या पक्षविरोधात जिंकून आले आहेत. शिर्डीच्या खासदारने दोनवेळा गद्दारी केली. तरीही त्याला तिकीट दिल. काही लोकांना पक्षात घ्यायला माझा विरोध होता. ते पुन्हा पुन्हा बेईमानी करतील, असं मी सांगत होतो. पण, उद्धव ठाकरे दयाळू आहेत. त्यांनी या लोकांना संधी दिली. आता या लोकांना वाटतंय त्यांनी फार मोठा तिर मारलाय, पण हा तिर त्यांच्याच ***” असे म्हणत राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.