BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू? (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : भाजपने पुढील सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलाने होईल, तसेच भाजपच्या संघटनेत मोठे बदल केले जातील, ज्यात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली नवीन टीम स्थापन करण्याचाही समावेश आहे. या संदर्भात भाजपमध्ये बैठका सुरू आहेत. पक्षाच्या सूत्रांनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप मुख्यालय यांच्यात बैठका झाल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करून नितीन नवीन टीमची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून परतण्याची प्रतीक्षा आहे. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक निर्णय घेतले जाऊ शकतात, असेही वृत्त आहे. भाजपच्या संघटनात्मक रचनेत, मार्गदर्शक मंडळ हे संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या वर आहे. मात्र, ही एक सल्लागार समिती आहे जी पक्षाच्या व्यापक धोरणांवर आपले विचार मांडते. सध्या, भाजपच्या मार्गदर्शक मंडळात पंतप्रधान मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि राजनाथ सिंह या चार नेत्यांचा समावेश आहे.
अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे या मंडळांचे केवळ नाममात्र सदस्य आहेत. खरे तर, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना सक्रिय राजकारणातून दूर करण्यासाठीच मार्गदर्शक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. असे वृत्त आहे की, अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक मंडळातून काढून टाकले जाऊ शकते आणि दोन नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
11 सदस्यीय मंडळात कोण?
११ सदस्यीय संसदीय मंडळात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राजनाथ सिंह, अमित शाह, जे. पी. नड्डा, येडियुरप्पा, सरबानंद सोनोवाल, डॉ. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया आणि राष्ट्रीय संघटना महासचिव बी. एल. संतोष यांचा समावेश आहे. अलीकडेपर्यंत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे माजी अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील संसदीय मंडळावर होते. नंतर या दोन्ही नेत्यांना हटवण्यात आले.
फडणवीसांचा समावेश शक्य
सध्या भाजपचा एकही मुख्यमंत्री संसदीय मंडळावर नाही. यापूर्वी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. जेव्हा मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना स्थान देण्यात आले होते. आता शिवराज यांनाही वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याशिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे हिमंता बिस्वा सरमा आणि पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारी यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.






