
मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग
महासभेदरम्यान एखादा विषय किंवा सूचना मांडायची असल्यास ती आयुक्तांकडे मांडावी, अशी भूमिका महापौरांकडून घेतली जात असल्याचे नगरसेविकांचे म्हणणे आहे. मात्र, महानगरपालिकेच्या धोरणांवर आणि कोट्यवधी रुपयांच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी महासभा बोलावली जात असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलण्याची संधीच दिली जात नसेल, तर महासभेत आम्हाला बोलावलेच का जाते, असा सवाल शिवसेना नगरसेविकांनी उपस्थित केला.
“महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या विषयांवर आम्हाला चर्चा करता येत नसेल, आमच्या सूचना मांडू दिल्या जात नसतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची भूमिका काय?” असा सवाल आंदोलनकर्त्या नगरसेविकांनी उपस्थित केला. दरम्यान, मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपकडून “हिटलरशाही” सुरू असल्याचा गंभीर आरोप शर्मिला बागजी यांनी केला. शहरात शिवसेना विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष सर्वश्रुत असून, त्याचा राग शिवसेनेच्या नगरसेवकांवर काढला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकारामुळे विशेष महासभेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, विरोधकांना सभागृहात बोलण्याची संधी आणि लोकशाही पद्धतीने चर्चा करण्याचा अधिकार दिला जातो की नाही, यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मिरा-भाईंदरच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष नवीन नाही. स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. आता हा संघर्ष महापालिकेच्या महासभेतील कामकाजातही दिसून येत असल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
शर्मिला बागजी यांनी केलेल्या ‘हिटलरशाही’च्या आरोपामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादाला आणखी धार आली आहे. मात्र, या आरोपांवर भाजपकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. एकूणच, विरोधकांना बोलण्याची संधी, महासभेतील कामकाजाची पद्धत आणि सत्ताधारी-विरोधकांमधील वाढता संघर्ष यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब